तुम्हाला 'झुमका गिरा रे..' हे गाणं आठवतंय.. तो झुमका बरेलीच्या बाजारातच पडलेला पण त्या झुमक्याची गोष्ट मोठ्या पडद्यावरुन सगळीकडे पसरलेली. आता यावेळी बरेलीचा झुमका नाही तर बरेलीची बर्फी खायला उत्सुक आहेत आयुषमान खुराना, क्रिती सेनन आणि राजकुमार राव. हे तिन्ही कलाकार लवकरच एका सिनेमातून एकत्र येणार आहेत. या सिनेमाचं नाव असेल 'बरेली की बर्फी'. या सिनेमाचं अधिकतर चित्रिकरण उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. या सिनेमाच्या कथानकाबद्दल अजून काही कळले नाही. पण 'निल बटे सन्नाटा' सिनेमाची निर्माती अश्विनी अय्यर तिवारी हिच या सिनेमाचीही निर्मिती करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमात आयुषमान एका प्रिन्टिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या मुलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिकडेच क्रिती एका शहरी मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमात राजकुमार राव एका लेखकाची भूमिका साकारणार आहे. सध्या या सिनेमाशी निगडीत अनेक कलाकार हे त्यांच्या इतर सिनेमांमध्ये व्यस्त असल्यामुळे अजून या सिनेमाचे चित्रिकरण सुरु झाले नाहीए. आयुषमान 'मनमर्जिया' या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तर क्रिती 'राबता' या सिनेमामध्ये व्यग्र आहे. अश्विनी अय्यर या पण 'मनमर्जिया' याच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. 'मनमर्जिया'चे काम पूर्ण झाल्यानंतरच त्या 'बरेली की बर्फी' या सिनेमाच्या कामामध्ये गुंतणार आहेत. जर सिनेमासाठी हेच कलाकार नक्की झाले तर आयुषमान खुराना आणि क्रिती पहिल्यांदी एकत्र काम करतील.