एम टिव्हीवरील ‘कैसी ये यारिया’..’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेला छोट्या पडद्यावरील कलाकार पार्थ सामथान सध्या मॉडेल सुष्मिता चक्रवतीने केलेल्या गंभीर आरोपामुळे चर्चेत आहे. सुष्मिताने त्याच्यावर छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. पार्थ विरोधात तिने मुंबईतील बांगूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पार्थला याप्रकरणी अटक केले नसले, तरी त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. या चौकशीदरम्यान पार्थने निर्दोष असल्याचे सांगत मॉडेलने चूक कबुल केल्याचे सांगितले आहे.

मॉ़डेलने केलेल्या आरोपावर पार्थ म्हणाला की, माझ्यावर केलेला आरोप हा निराधार आणि साफ चुकीचा आहे. मी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन माझी बाजू मांडली आहे. मी निर्दोष असल्यामुळेच मी बाहेर आहे. दीड वर्षांपूर्वी माझा मित्रांसोबत किरकोळ वाद झाला होता. या जुन्या प्रकरणावरुन सुष्मिता चक्रवतीने कोणत्याही आधाराशिवाय माझ्या विरोधात तक्रार नोंदवली. तिने विकास गुप्तासोबत माझ्याविरोधात कट रचला असल्याचे तो म्हणाला.

सुष्मिताविषयी बोलताना तो म्हणाला की, तक्रार दाखल कल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुष्मिता माझ्याकडे आली होती. तिने चुक मान्य करत तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. पण एफआयआर नोंद झाल्यामुळे पोलिसांना तक्रार मागे घेता येऊ शकत नाही. सुष्मितासोबतचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉटसअॅपवरील संभाषणाचे पुरावे मी पोलिसांना दिले असून त्यामध्ये सुष्मिताने हा सर्व प्रकार भावनेच्या भरात केल्याचे सिद्ध होईल. त्यामुळे माझी या प्रकरणातून निर्दोष सुटका होईल.

कटकारस्थानासंबंधी त्याने विकास गुप्तावर निशाणा साधला. विकास हा मला वेळोवेळी कमी दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा हा स्वभाव सर्वज्ञात आहे. प्रेक्षक अशा गोष्टीमध्ये फारच संवेदनशील असतात, हा सर्वप्रकार त्यांनाही माहिती आहे, असे सांगत प्रेक्षक वर्ग माझ्या पाठिशी ठाम उभा असल्याचा विश्वास देखील त्याने व्यक्त केला. दरम्यान, पार्थने अत्याचाराविरोधात लढण्यासाठी महिलांना मिळणाऱ्या विशेष अधिकाराचा आदर असल्याचे सांगत या अधिकाराचा गैरवापर करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.