खोकला, घशाच्या संसर्गाच्या तक्रारींमध्ये वाढ ऑक्टोबर उकाडय़ामुळे मुंबईकर पुरते हैराण झाले असून वातावरणाच्या बदलामुळे खोकला, सर्दी आणि घशांच्या संसर्गामध्ये वाढ झाली असून दिवाळ्यात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणात या रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता श्वसनविकारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वातावरणातील बदलामुळे हवेमध्ये विषाणूंचा प्रभाव वाढतो आणि अयोग्य जीवनशैलीमुळे विषाणू माणसांच्या शरीरावर परिणाम करतात. यामुळे रूग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे असे परिणाम दिसतात. याबरोबरच डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ अशा समस्या असणाऱ्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे बदलत्या ऋतुमानानुसार आहारात बदल करणे आवश्यक आहे असे डॉ. अश्विन सावंत यांनी सांगितले. थंडीच्या दिवसांमध्ये श्वसनाचे आजारांमध्ये वाढ होते. त्यात यंदा ऑक्टोबर महिन्यातच दिवाळी आल्यामुळे श्वसनाच्या रूग्णांची संख्या वाढू शकते. फटाक्यांमधून निघणाऱ्या घटकांमुळे प्रदुषण वाढीस लागते आणि दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान श्वसनाचे आजार असलेल्या रूग्णांमध्ये वाढ होते असे ठाण्यातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. मनोज मस्के यांनी सांगितले. सर्दी या आजारासाठी वातावरणातील बदल आणि प्रदुषण ही कारणे जबाबदार असून प्रदुषणामुळे लोकांना अॅलर्जीचा त्रास सुरू होतो. यात सतत शिंका येणे, नाक आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे पाहावयास मिळतात. पावसाळ्यानंतर विविध साथींच्या आजाराची सुरूवात झाली असून यंदा ऑक्टोबर महिन्यातही खोकला, सर्दीचे रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामध्ये वातावरणाच्या बदलाबरोबरच आहाराकडे केलेले दुर्लक्ष आणि वाढते प्रदुषणही आहे, असे डॉ.एल.एम. सामंत यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक काळजी उन्हाळा वाढत असला तरी थंड पदार्थाचे सेवन करणे टाळावे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी चौरस आहार असावा. थंड पाण्याऐवजी गरम पाणी प्यावे. रोज व्यायाम करावा.