लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. कारण त्यासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. घाटकोपर परिसरातील चिरागनगर येथे अण्णाभाऊंचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत स्मारक उभारण्याच्या कामास गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 'अण्णा भाऊ साठे स्मारक समिती'ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत स्मारकासाठी जागेची निवड, स्मारक परिसराचा विकास, स्मारक परिसरातील भाडेकरुंचे पुनर्वसन, विकासकाची नियुक्ती यांसह इतर कामकाजात पाहण्यात येणार आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उपाध्यक्ष व सदस्य सचिव म्हणून मधुकर कांबळे त्याचबरोबर सदस्य म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे, संजय कुटे, सुधाकर भालेराव, राम कदम तसेच नगरसेवक अमित गोरखे यांच्यासह विविध शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन जयंतीदिनी ? पुण्यातील संगमवाडी भागात क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे स्मारक करण्याविषयी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी फडणवीस यांनी स्मारकाचे बांधकाम दर्जेदार व उत्तम व्हावे. त्यांच्या येत्या जयंतीला स्मारकाचे भूमिपूजन व्हावे, अशा दृष्टीने हे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना पुणे महापालिका आयुक्तांना दिल्या.