नरिमन पॉइंट ते बोरिवली व्हाया वांद्रे पर्यंतचा प्रवास आता फेरी बोटींमार्फत करणे शक्य असून पावसाळ्यानंतर ही सेवा चालू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने या दोन ठिकाणांदरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी मागवलेल्या इरादापत्राला मे. स्टार फेरी या कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या ऑक्टोबरपासून ही जलसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबईची पश्चिम किनारपट्टी विकसित करण्याचे काम हाती घेतले असून त्याच अनुषंगाने ही प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यासाठी आखणी करण्यात आली आहे. बोरिवली येथे जेट्टी असून नरिमन पॉइंट येथे जेट्टी नसल्याने ‘एनसीपीए’ जवळ अशी एक तरंगती जेट्टी बांधण्यात येणार आहे. तसेच, जुहू, वांद्रे, वर्सोवा, मार्वे या ठिकाणी देखील या फेरी सेवेला थांबा मिळणार आहे. वांद्रे येथे मुंबई मेट्रो रेल महामंडळामार्फत खोदकाम सुरू असून यातून निघणारी माती-दगड हे पाणी अडविण्यासाठी व जेट्टी बांधण्यासाठी वांद्रे येथे वापरण्यात येणार आहे. तसेच सकाळी साडेसहा ते रात्री ९ पर्यंत ही फेरी सेवा चालू राहणार असल्याने या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हा जलप्रवास कसा असणार आहे तसेच यासाठी भाडे किती असेल याचे सादरीकरण मे. स्टार फेरी यांच्याकडून करण्यात आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच ३१ जानेवारी इरादापत्र सादर करण्याची शेवटची तारीख असली तरी अन्य कंपन्यांनी संपर्क साधल्यास त्यांच्या प्रस्तावांचा विचार करता येईल असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मुंबईची पश्चिम किनारपट्टी विकसित करण्याच्या हेतूने ही फेरी सेवा आम्ही सुरू करत आहोत. यामुळे पश्चिम रेल्वेवर पडणारा प्रवाशांचा मोठा भार कमी होईल. तसेच, भविष्यात जल वाहतूक महामंडळ स्थापन करण्याचा आमचा विचार असून याद्वारे अन्य जलसेवांचा विचार करण्यात येईल. - अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ