विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या सदोष पद्धतीचा विद्यार्थ्यांला फटका मुंबईतील प्रथितयश महाविद्यालयात संगणक विज्ञान शाखेत शिकणारा सार्थक (नाव बदलले आहे) तसा हुषार. पदवी अभ्यासक्रमाच्या पाचही सत्र परीक्षांमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा. त्यामुळे पदवीच्या अखेरच्या वर्षांला असतानाच मे महिन्यात त्याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरीही मिळाली. वार्षिक दोन लाख रुपये पगार कंपनीने त्याला दिला. मात्र, त्याच्या नोकरीवरच आता गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण विद्यापीठाने त्याला चक्क नापास ठरवले आहे! विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या सदोष पद्धतीचा सार्थकला फटका बसला आहे. संगणक विज्ञान शाखेतून सार्थकने पदवी परीक्षा दिली आहे. पाचव्या सत्रापर्यंत सार्थक त्याच्या महाविद्यालयात कायमच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आलेला आहे. या पाश्र्वभूमीवर त्याला चांगली नोकरीही मिळाली. आवडते काम आणि इतक्या मोठय़ा कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने खुशीत असलेल्या सार्थकच्या आनंदावर मात्र संगणक विज्ञान शाखेचा निकाल जाहीर होताच विरजण पडले. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ३१ जुलै रोजी संगणक विज्ञान शाखेचे निकाल जाहीर झाले. निकालाची उत्सुकता असणाऱ्या सार्थकने संकेतस्थळ उघडले आणि नापासाचा शेरा पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. सॉफ्टवेअर इंजिनीअिरग या विषयात १०० पैकी केवळ १८ गुण मिळाल्याने सार्थकला नापास करण्यात आले आहे. त्याला हा विषय पाचव्या सत्रामध्येही होता. त्यात त्याला ७० हून अधिक गुण मिळाले आहेत. तसेच संगणकीय भाषेच्या एका विषयामध्येही उत्तीर्ण होण्यापुरतेच म्हणजेच ३५ गुण देण्यात आले आहेत. सार्थक संबंधित कंपनीत प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षणाचा कालावधी लवकरच संपणार असून त्याला आता पदवीची गुणपत्रिका सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच त्याला नोकरीत पुढच्या काळामध्ये रुजू करून घेतले जाणार आहे, परंतु पदवी परीक्षेत नापास झाल्याचे गुणपत्रिकेवर दाखविण्यात येत असल्याने सार्थकच्या नोकरीवरच आता गदा आली आहे. यासंदर्भात सार्थकने त्याच्या महाविद्यालयाशी संपर्क साधला आहे. महाविद्यालयातील प्राचार्यानी विद्यापीठाकडे विचारणा केली असता निकालाची जुळवाजुळव करण्यामध्ये अनेक तांत्रिक गोंधळ झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे घडले आहे, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयाने उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होईपर्यंत सार्थकला वाट पाहण्यास सांगितले आहे. ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये केवळ पुरवण्यांच्या गुणांचा समावेश केल्याने त्याला एका विषयात इतके कमी गुण मिळाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीने पुनर्मूल्यांकनाच्या निकालापर्यंत थांबण्याची तयारी दर्शविली आहे, परंतु अद्याप पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज घेण्यासही सुरुवात झालेली नाही. तेव्हा ही प्रक्रियाही किती काळ लांबेल याबाबत सांगणे कठीण आहे. त्यामुळे चांगल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे अशीच चिन्हे सध्या दिसत आहेत. - सार्थक