राणीच्या बागेतील पेंग्विनच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने होर्डिंग्जच्या माध्यमातून शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकेर यांना लक्ष्य केले आहे. मनसे आणि काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने या वादात उडी घेतल्याने आता सत्ताधारी शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंगळवारी रात्री मातोश्रीसह मुंबईच्या विविध भागात होर्डिंग लावले. या होर्डिंग्जवर 'मारून दाखवलं' असा संदेश लिहून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. मातोश्रीसोबतच शिवसेना भवन, राणीबाग, मंत्रालय आणि वरळी सी लिंक अशा ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे होर्डिंग लावण्यात आले होते. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अनेक फलक फाडून टाकल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना आता राष्ट्रवादीच्या या झोंबऱ्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भायखळ्यातील ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्याना’त रविवारी एका दीड वर्षांच्या मादी पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर उर्वरित पेंग्विनना त्यांच्या घरी परत पाठवा, अशी मागणी जोर धरू लागली असताना पालिका अधिकाऱ्यांनी मात्र नोव्हेंबरमध्ये पर्यटकांकरिता पेंग्वीन दर्शनाचा मुहूर्त गाठता यावा यासाठी लगीनघाई सुरू केली आहे. प्राणीमित्रांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण कोरियातील सेऊलमधील आठ हम्बोल्ट पेंग्विन आणले होते. या पेंग्विनच्या खरेदीसाठी पालिकेने सुमारे ३ कोटी रुपये मोजले होते. याशिवाय त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले १७०० चौरस फुटांचे शीतघर, २५० चौरस फुटांचे विशेष संरक्षित क्षेत्र, तापमान नियंत्रण, तलाव तसेच पेंग्विनची पाच वर्षे देखभाल व निगा या सगळ्यासाठी तब्बल ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.