हार्बरच्या १२ डब्यांसाठी रेल्वेचा ‘जुगाड’ हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी एमआरव्हीसी एकीकडे महा-मेगाब्लॉकची तयारी करत असताना मध्य रेल्वेनेही डब्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. १२ डब्यांच्या गाडय़ा आणि डीसी-एसी परिवर्तन हे दोन्ही प्रकल्प हार्बर मार्गावर महत्त्वाचे असल्याने मध्य रेल्वेला एकाच वेळी प्रत्येक गाडीला तीन डबे जोडण्यासाठी डब्यांची जुळवाजुळव आणि या सर्व गाडय़ा एसी विद्युतप्रवाहावर चालण्यासाठी विद्युत यंत्रणेत बदल, ही दोन्ही कामे एकाच वेळी करावी लागत आहेत. सध्या मध्य रेल्वे डीसी-एसी परिवर्तनाला महत्त्व देत असून रेल्वेच्या ताफ्यातील हार्बर मार्गावरील ४१ पकी २४ गाडय़ांचे डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाले आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या वाढूनही येथे प्रवाशांसाठी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर एमयूटीपी-दोन या प्रकल्पांतर्गत हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याच प्रकल्पाचा भाग म्हणून हार्बर मार्गावरील विद्युतप्रवाहाचे डीसी-एसी परिवर्तनही करण्यात येणार आहे. हे परिवर्तन ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र १२ डब्यांच्या गाडय़ा हार्बर मार्गावर धावण्यासाठी त्यानंतर एक महिना वाट पाहावी लागणार आहे. हार्बर मार्गावर एकूण ४१ गाडय़ा असून त्यातील ३६ गाडय़ांमार्फत ५९० फेऱ्या चालवल्या जातात. यापकी २३ गाडय़ांचे डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाले आहे. एक सिमेन्स गाडी एसी-डीसी असून उर्वरित १७ गाडय़ांचे विद्युत परिवर्तन अद्याप बाकी आहे. हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी स्पष्ट केले. डीसी-एसी परिवर्तन हा मध्य रेल्वेपुढील प्रश्न नसून बारा डब्यांसाठी लागणारे १३२ डबे जुळवणे ही मोठी समस्या असल्याचे ओझा यांनी सांगितले.