प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये गुडघे व कंबरेच्या खुब्याचा (हिप) आजार मोठय़ा प्रमाणात असून यावरील प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपयांपासून चार लाख रुपयांपर्यंत खर्च येत असतो. महापालिका व राज्य शासनाच्या रुग्णालयातही सुमारे अडीच लाख रुपये खर्च येत असल्यामुळे वयोवृद्ध गरिबांचा विचार करून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या दोन्ही शस्त्रक्रिया ‘राजीव गांधी जीवनदायी योजने’मधून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे हृदयविकारावरील अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेसाठी तीन स्टेंटपर्यंतचा खर्च आणि फिजिओथेरपीचा खर्चही राजीव गांधी योजनेतून देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. तत्कालीन युती शासनाच्या काळात दारिद्रय़ रेषेखालील रुग्णाला हृदय, किडनी, मेंदू तसेच मज्जासंस्थांच्या शस्त्रक्रियेसाठी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येत होती. आघाडी सरकारच्या काळात या योजनेचे स्वरूप बदलून ‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ असे नामकरण करण्यात येऊन ९७१ प्रकारच्या उपचार पद्धतींसाठी (शस्त्रक्रिया) दीड लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येऊ लागली. इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून यामध्ये गुडघा व कंबरेच्या खुब्याच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची वारंवार मागणी करूनही समावेश करण्यात आला नव्हता. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात बहुतेक हृद्रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन किंवा तीन ब्लॉक सापडणे ही नित्याची बाब बनल्याचे दिसून येते. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतील सर्व उपचार पद्धतींचा अभ्यास करून त्यातील ज्या १२० पद्धती वापरल्या जात नाहीत त्या रद्द करून त्याऐवजी नि व हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, तीन स्टेंटचा खर्च तसेच मूत्रपिंडदात्याला एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत २०१३-१४ मध्ये १,३२,३६८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यापोटी सरकारने ३४२ कोटी १० लाख रुपये खर्च केले, तर २०१४-१५ मध्ये १,९२,६५९ शस्त्रक्रिया करण्यात येऊन ४७० कोटी रुपये खर्च केले. डॉ. दीपक सावंत यांनी गुडघे आणि कंबरेच्या खुब्याच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा समावेश यात केल्याने हजारो रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. देशात दरवर्षी सुमारे दोन लाख गुडघे व कंबरेच्या खुब्याच्या तीन लाख प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असतात.