सकाळपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप आणि रस्त्यांवरील खड्डे यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक शनिवारी पुन्हा एकदा मंदावली. त्यातच मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठय़ा धुमधडाक्यात काढलेल्या गणेश आगमनाच्या मिरवणुकांची भर पडली आणि मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. पाऊस, खड्डे आणि गणेश मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मध्य मुंबईत संथगतीने वाहतूक सुरू होती.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात शुक्रवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता. शनिवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता घसरली होती.  पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच रस्त्यांची चाळण झाल्याने वाहतूकीची गती आणखी मंदावली होती. जेजे उड्डाणपूल, पूर्व मुक्त मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू वगळता सर्व ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. खोदादाद सर्कल, छेडा नगर जंक्शन, एस. व्ही. रोड, एअरपोर्ट रोड, मेट्रो ते पश्चिम द्रुतगती महामार्ग, मरोळ-मरोशी मार्ग, मरोळ नाका ते सिप्झ या मार्गावर वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. मानखुर्द येथे शुक्रवारी पहाटे उड्डाणपुलावरुन वस्तीवर कोसळलेला डंपर काढण्यासाठी दुपारी सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग थेट देवनापर्यंत आली होती. त्यामुळेही पूर्व उपनगरांत वाहतूक कोंडी झाली होती. कांदिवलीच्या साईधाम भूमिगत मार्ग पाणी साचल्याने वाहतूकीसाठी बंद करावा लागला. त्यातच ठाकूर कॉम्प्लेक्स येथील रस्ते खड्डेमय असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. परिणामी मागाठणे आणि ठाकूर कॉम्प्लेक्स उड्डाणपूलावर पार करण्यास ३० मिनिटे लागत होती.

  • अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने अनेक मंडळे लालबाग परिसरातील गणेश कार्यशाळांमधून गणेशमूर्ती मंडपस्थळी घेऊन जात आहेत. त्यामुळे शनिवारी लालबाग, करी रोड या परिसरातील वाहतूक अतिशय संथगतीने सुरू होती.
  • रविवारी मोठय़ा मंडळांच्या मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने या परिसरात वाहतूकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.