राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा केंद्र सरकारने तूर खरेदीसाठी १५ मार्चपर्यंतची मुदत दिली असली तरी तुरीच्या उत्पादनात झालेली वाढ लक्षात घेता तूर खरेदी केंद्रे १५ मार्चनंतरही सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुदतवाढीसंदर्भात राज्याकडून केंद्र सरकारला विनंती करण्यात आली आहे. राज्यात यंदा उत्तम पाऊस झाल्याने तुरीच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे तूर खरेदीत सातत्याने वाढ होत आहे. तूर खरेदीकरिता आवश्यक असणारा बारदाना तसेच साठवणुकीसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे खरेदी केंद्राकडून तूरच खरेदी केली जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. याची दखल घेत तूर खरेदीच्या संदर्भात पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश विभागास दिले. तुरीची आवक मोठय़ा प्रमाणात असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये वखार महामंडळाने पणन महासंघ, कापूस महासंघ, जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, बाजार समिती, सहकारी संस्था यांची गोदामे प्राधान्याने तूर साठवणुकीसाठी भाडय़ाने घ्यावीत तसेच विशेष बाब म्हणून खासगी गोदामेही भाडय़ाने घ्यावीत असे आदेशही देशमुख यांनी दिले आहेत. खरेदी अशी.. ’केंद्र सरकारच्या ‘भाव स्थिर योजने’ अंतर्गत आधारभूत दराने राज्यात तुरीची खरेदी केली जाते. ’पणन विभागाअंतर्गत पणन महासंघ, नाफेड व भारतीय अन्न महामंडळ यांच्यातर्फे तुरीची खरेदी केली जाते ’आतापर्यंत १२५ खरेदी केंद्रांवर नऊ लाख ९२ हजार क्विंटल तुरीची खरेदी ’शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी केली जाईपर्यंत सर्व केंद्रे सुरू राहणार, पणन विभागाची माहिती