अंबरनाथजवळच्या शिरवली गावात किरकोळ कारणावरून बुधवारी झालेल्या मारहाणीत दोन गटातील दहाजण जखमी झाले. यातील दोघांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावातील नवरात्रोत्सवात देवीच्या विसर्जन मिरवणूकीवरुन दोन गटात वाद झाला होता. या वाद मिटवण्यासाठी बुधवारी सकाळी दोन्ही गट एकत्र आले होते. मात्र यावेळी वाद मिटण्याऐवजी वाद पराकोटीला गेला आणि दोन्ही गटात हाणामारी झाली. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला.