संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांची खंत आजचा युवक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना भरकटलेला दिसतो. आवश्यक गोष्टींसाठी तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा अनावश्यक गोष्टींसाठी विद्यार्थी तंत्रज्ञान वापर करताना दिसतो, अशी खंत प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केली. येथील अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या उच्चशिक्षण विभागातर्फे आयोजित सांस्कृतिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी गोडबोले यांनी आजचा युवक आणि तंत्रज्ञान या विषयावर मत व्यक्त केले. आजच्या युवकाने तंत्रज्ञान आणि संगणकाचा उपयोग स्वत:ची कौशल्ये विकसित करण्यासाठी व समाज विकासासाठी वापरल्यास उद्याचा भारत देश नव्हे, तर संपूर्ण जग हे भारतीय युवकाच्या खांद्यावर असेल. ग्रामीण भागातील युवकांमध्ये कलाकौशल्ये फार मोठय़ा प्रमाणात विकसित झालेली असतात. परंतु, ते तंत्रज्ञानाचा वापर व इंग्रजीचा अभाव या दोन गोष्टींमुळे आजच्या स्पर्धेत अपयशी होत आहेत. त्यामुळे त्यांनी संगणक व तंत्रज्ञान यास न घाबरता धैर्याने तंत्रज्ञानाचा वापर करावा व जगातील नवनवीन यशाची शिखरे आपल्या हातात घ्यावीत. तेव्हाच तंत्रज्ञानावर आधारित भारत तयार होईल, अशी अपेक्षा गोडबोले यांनी व्यक्त केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी विद्यार्थ्यांना संगणकाचे महत्त्व व सांस्कृतिक महोत्सव यांचे जीवनात कसे महत्त्व आहे याविषयी मार्गदर्शन केले.