वाहतूक नियंत्रणासाठी उपाय शहरातील दिवसागणिक बिकट बनलेला वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळ्या ११ ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली आहे. वाहतूक पोलिसांनी २१ ठिकाणी सिग्नलची गरज असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून तसा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी ११ ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली आहे. ही ठिकाणे निवडण्याचा अधिकारही वाहतूक पोलीस विभागाला देण्यात आला आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या विषयावर काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी, नागरिक, वाहतूक संघटना आदींच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसागणिक वाढत चाललेल्या वाहतूक समस्या, कोंडीचा प्रश्न सर्वासाठी डोकेदुखी ठरत आहे. बेशिस्त चालक व नियोजनशून्य व्यवस्था अनेकांच्या जिवावर बेतत आहे. वाहतुकीशी संबंधित तक्रारी व सूचनांची दखल घेऊन पोलिसांनी शहरातील अपघातग्रस्त ठिकाणे ‘ब्लॅक स्पॉट’ जाहीर केले तर ज्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी जाणवते, तिथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला. या प्रस्तावात शहरातील २१ ठिकाणांची निवड करण्यात आली. उपरोक्त ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वाहतूक नियंत्रण व कोंडी कमी करता येईल. महापालिकेने त्यातील ११ ठिकाणी सिग्नल बसविण्यास परवानगी दिली आहे. एकूण ठिकाणांमध्ये कोणत्या ठिकाणी सिग्नलची अधिक गरज आहे, ते लक्षात घेऊन वाहतूक पोलीस या ठिकाणांची निवड करणार आहेत. त्यात गंगापूर रोडवर विद्या विकास सर्कल, जेहान चौक यांचा अंतर्भाव राहील. जेहान सर्कल येथे महाविद्यालय व शाळा सुटण्याची व भरण्याच्या वेळी तसेच सकाळी व सायंकाळी कमालीची गर्दी होते. या चौकातून मार्गस्थ होताना वाहनधारकांची चढाओढ सुरू असते. यामुळे या ठिकाणांची निवड करण्यात आली. हीच स्थिती नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील एबीबी चौकात असते. या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे दुचाकी व चारचाकी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. शहर वाहतूक पोलिसांना वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम करावे लागते. सणोत्सव काळात त्र्यंबककडे भाविकांची होणारी गर्दी पाहता तर या ठिकाणी सिग्नल गरजेचा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बहुचर्चित इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, गोविंद नगर येथुन तिडके कॉलनीकडे जाणारा रस्ता, द्वारका चौफुलीकडून तपोवनच्या दिशेने जाणारा रस्ता अशा काही ठिकाणांची सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नागरिकांकडून मागणी झाल्यास त्या त्या ठिकाणाचा विचार होणार असल्याचे शहर वाहतूक शाखेचे प्रमुख जयंत बजबळे यांनी सांगितले. दरम्यान, सध्या आचार संहिता असल्याने प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. निवडणूका पार पडल्यानंतर निविदा काढून या कामास सुरूवात होईल. पुढील तीन ते चार महिन्यांत शहरात नव्याने ११ सिग्नल कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा आहे. अमृतधाम, रासबिहारी चौक येथे वेगळीच अडचण शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील क. का. वाघ महाविद्यालय ते अमृतधाम, रासबिहारी चौकापर्यंत अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. रासबिहारी चौकात उड्डाण पुलाची उभारणी प्रस्तावित आहे. या परिसरात अपघातप्रवण क्षेत्राची ठिकाणे वाहतूक पोलिसांनी निश्चित केली. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारित असल्याने त्या प्रस्तावाचे काही होऊ शकले नाही. त्यातच या ठिकाणी उड्डाण पुलास मंजुरी मिळाली असून सिग्नल सुरू करायचा तर वेळेची तांत्रिक अडचण राहणार आहे. या परिस्थितीवर काय तोडगा काढता येईल, याचा विचार सुरू आहे.