विनोद तावडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण लॉर्ड मेकॉलेने आणलेल्या शिक्षण पध्दतीमुळे ज्ञानापेक्षा स्मरणशक्तीची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. ती शिक्षण पध्दती बदलून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारधारेवर आधारलेले शिक्षण देण्याची गरज आहे. त्या पध्दतीने आमचे सरकार काम करीत असल्याचे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निगडी प्राधिकरण येथे केले. निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तावडे बोलत होते. ‘सूरमन संस्थान जयपूर’ या संस्थेला तावडे यांच्या हस्ते यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे मनन चतुर्वेदी यांनी स्वीकारला. सुभाष चत्तुर यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर सावरकर मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव रिकामे, कार्याध्यक्ष विनोद बन्सल, सचिव भास्कर रिकामे आदी उपस्थित होते. तावडे म्हणाले, देशातील एक विचारसमूह हा कुठेतरी सावरकरांचे विचार झाकत आहे. अशा प्रकारे झाकाळून त्यांचे काम, विचार थोपवू शकत नाही. सावरकरांना झाकोळण्याचे काम विशिष्ट विचारधारेने केले आहे. मात्र, त्यांच्याच विचाराचे राज्यात, केंद्रात आणि पालिकेत असलेल्या सरकारने दाखवून दिले की, त्यांना कोणी झाकोळून देऊ शकत नाही. सावरकरांनी देशभक्ती, जातीपातीच्या विरोधातील लढा आणि गोवंश हत्याबंदीबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोन परखडपणे मांडले. साहित्यिक म्हणूनही ते खूप मोठे होते. सावरकरांनी समुद्रामध्ये उडी कधी मारली याला गुण मिळतात. फक्त सणावळ्या शिकवल्या जातात. उडी का मारली याची प्रेरणा देणारे शिकवले जात नाही. ती प्रेरणा इतिहासातील शिक्षणातून मिळेल, हे करण्याचे काम आमचे सरकार करीत आहे व यापुढेही करीत राहणार आहे.