भरारी-अस्थिव्यंग विकलांग संस्था, डोंबिवली सामूहिक प्रयत्नांनी अपंगत्वावर मात करून अधिक आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगता येते, हे डोंबिवलीतील भरारी-अस्थिव्यंग विकलांग संस्थेने दाखवून दिले आहे. गेली १९ वर्षे कार्यरत असणाऱ्या या संस्थेचा वर्धापन दिन रविवार १३ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने या संस्थेच्या वाटचालीचा आढावा.. साधारण १९९४ च्या सुमाराची गोष्ट. डोंबिवली शहरात रामनगर येथील एका दुर्लक्षित बागेत सहा-सात अपंग मित्र दर रविवारी भेटत असत. विजय प्रधान (भाऊ), दिलीप अढळीकर, संजीव मांद्रेकर, मंदार दीक्षित, चंद्रशेखर बेजकर, विनोद शहा अशी त्यांची नावे. एकत्र जमून सुख-दु:खाच्या गप्पागोष्टी, हास्यविनोद करणे हाच त्यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश होता. या बागेजवळून येणारी-जाणारी माणसेही त्यांच्या आनंदात सहभागी होत असत. फिजिओथेरपीस्ट असलेल्या डॉ. अंजली आपटे अशाच मंडळींपैकी एक. शरीराने अपंग असतानाही सदैव प्रसन्न दिसणाऱ्या या मित्रांबद्दल त्यांना खूप कुतूहल वाटे. मात्र पावसाळय़ात एकेदिवशी त्यांना ही मंडळी दिसली नाही. म्हणून डॉ. अंजली यांनी चौकशी केली असता पावसामुळे त्यांना बाहेर पडता येत नसल्याचे त्यांना समजले. त्यांची ही अडचण पाहिल्यानंतर डॉ. अंजली यांनी या मित्रांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्या भेटीला विधायक स्वरूप देण्याचा सल्ला दिला. ‘एखादी संस्था सुरूकरू या, जी फक्त अपंगांसाठी कार्य करेल. त्यांच्या समस्यांवर उत्तर शोधेल. तुमच्यासारख्या अन्य अपंग बांधवांनाही यामध्ये सामील करून घेता येईल. मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते तुम्हाला सहकार्य करतील,’ असे डॉ. अंजली यांनी सुचवले. या सूचनेवर मित्रमंडळींमध्ये विचार सुरू असतानाच आणखी एक घटना घडली. डोंबिवली नगरपालिकेजवळ असणारा एका अपंगाचा टेलिफोन बुथ हटविण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांनी दिले होते. या मंडळींनी यावर एकत्र येत तत्कालीन आयुक्त मदान यांच्या कार्यालयावर थेट धडक दिली आणि अपंगांच्या व्यथा मांडल्या. आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करून अपंगांची बाजू योग्य असल्याचा निर्वाळा दिला. या घटनेनंतर विजय प्रधान यांनी अंपगांसाठी संस्था स्थापन करण्याचा निर्धार पक्का केला. आणि ३ डिसेंबर १९९६ या जागतिक अपंग दिनाच्या मुहूर्तावर भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्था स्थापन झाली. विजय प्रधान यांची एकमताने त्यावेळी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि एका सेवाव्रती चळवळीने भरारी घेतली. आजमितीला या संस्थेत ६०० ते ७०० आजीव सभासद आहेत. अपंगांचे पुनर्वसन, प्रशिक्षण आणि उपचार अशा अनेक अंगांनी संस्थेचे कार्य सुरूझाले. सर्वात आधी एक महत्त्वाची समस्या समोर आली ती म्हणजे अपंगत्व दाखला मिळविण्यासाठी मुंबईला खेटे मारावे लागतात. सर्वच शासकीय व शैक्षणिक सवलती दाखल्यावर अबलंबून असल्या कारणाने ही वेळ अपंगांवर येऊ नये म्हणजे अपंगत्व दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत शिबिरांच्या माध्यमातून पाच ते सहा हजारांहून अधिक दाखले दिल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष अॅड. विनायक मालवणकर यांनी सांगितले. गेल्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत संस्थेने अपंगांसाठी अनेक कल्याणकारी उपक्रम राबविले. उदा. अपंगत्व दाखला, रेल्वे व एस.टी. प्रवास सवलतीचा लाभ अपंगांना मिळवून देणे, कॅलिपर्स, क्रचेस, व्हिलचेअर्स, श्रवणयंत्र इत्यादी उपकरणांचे वाटप करणे, अपंगांना व त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक व प्रासंगिक मदत करणे. त्यांच्या स्वावलंबित्वासाठी शिवणयंत्र, घरघंटी यांसारख्या उपयोगी वस्तूंचे वाटप करणे, अपंगांना स्टॉल्स मिळवून देणे, त्यांच्या नोकरीसाठी सहकार्य करणे असे अपंगांच्या हिताचे अनेक उपक्रम संस्था राबवित आहे. यंदा ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने शारीरिक विकलांग असलेल्यांना राज्य व केंद्र सरकारतर्फे कोणकोणत्या सुविधा मिळतात, याची माहिती देण्यात आली. तसेच ही माहिती अधिक अपंगांपर्यंत पोहोचवण्याचा व त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. शारीरिक विकलांग असलेल्यांना विनामूल्य कायदेशीर सल्ला देण्याची नवीन योजना संस्थेने सुरूकेली आहे. हे कार्य म्हणजे दिवंगत विजय प्रधान यांच्या वचनाची पूर्ती आहे. संस्थेतर्फे अपंगांसाठी वर्षां सहलीचे आयोजनही करण्यात येते. तसेच मकरसंक्रात, भजनसंध्या, नववर्ष स्वागत यात्रा आदी उपक्रमात ‘भरारी’ संस्थेचे सदस्य मोठय़ा उत्साहाने सहभागी होतात. डिसेंबर-जानेवारी महिन्यात घाटावर हुरडय़ा पाटर्य़ाना सुरुवात होते. त्याचा कोकणी अवतार म्हणजे पोपटी. काहीशी विस्मरणात गेलेली व शहरातील लोकांना अजिबात माहिती नसलेली ही पोपटी डोंबिवलीत मात्र गेल्या १७ वर्षांपासून संस्थेतर्फे पारंपरिक पद्धतीने आवर्जून साजरी होते. त्यात डोंबिवलीतील सर्व स्तरातील नामवंत व्यक्ती सहभागी होतात. ‘भरारी तिमिरातूनी तेजाकडे’ हे पुस्तक १८ एप्रिल २०१० रोजी प्रकाशित झाले. तसेच संस्थेची माहिती सर्वाना व्हावी या उद्देशाने एक माहितीपट बनविण्यात आला आहे. संस्थेचे स्वतंत्र संकेतस्थळही आहे. अपंगालय अपंगालय ज्येष्ठालय हा भरारीचा एक मुख्य प्रकल्प आहे. शारीरिक हालचालींवर खूपच मर्यादा आहेत असे अपंग आणि वृद्धापकाळाने अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची देखभाल एखाद्या संस्थेच्या माध्यमातून होणे ही काळाची गरज बनली. या रुग्णांसाठी एक केंद्र असावे अशी कल्पना प्रत्यक्षात साकारली ती २००५ साली. डॉ. तारा नाईक यांनी स्वत:च्या दोन खोल्या या अपंगालयासाठी सुरुवातीला दिल्या. परंतु ती जागा अपुरी पडू लागल्याने १५ ऑगस्ट २०१० रोजी मानपाडा रोडलगत असलेल्या साईधारा सोसायटीत अपंगालय सुरू करण्यात आले. या ठिकाणी ३० ते ३५ अपंगांची व्यवस्था आहे. त्यांना तज्ञांच्या सल्ल्याने आहार, वैद्यकीय सुविधा आणि मनोरंजनाची साधने येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मदतीस तत्पर असे सेवक वर्ग आहेत. भविष्यातील योजना केवळ निवारा नव्हे तर आत्मविश्वास निर्माण करणारे पुनर्वसन प्रकल्प राबविता येतील, असे अत्याधुनिक केंद्र संस्थेला उभारायचे आहे. त्यात मनोरंजन तसेच विरंगुळ्याची साधने, ऑडिटोरियम, संगणक कक्ष, संगीत कक्ष, बैठय़ा खेळांची सुविधा असणार आहे. तसेच तज्ज्ञांद्वारे समुपदेशनाची व्यवस्था, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, तसेच अपंगांना त्यांच्या घरून नेण्या-आणण्याच्या सोयीसह डे केअर सेंटर असेल. सुसज्ज व्यवसाय प्रशिक्षण केंद्र खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, अन्य छोटी उत्पादनांच्या निर्मितीसाठी सुसज्ज कार्यशाळा, तसेच संस्थेच्या माध्यमातून उत्पादीत वस्तूंच्या विक्रीसाठी केंद्र असेल. संस्थेने गेल्या वर्षी डोंबिवलीजवळ तळोजा काँक्रीट रोडलगतच्या तलावाजवळ २० गुंठे जागा विकत घेतली आहे.