विक्रमगड तालुक्यातील साखरे या गावात पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रकार गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळून लावला असून, या ठिकाणी मानवी कवटय़ा, हाडे, शस्त्रे, काडतूस व बनावट नोटांचे अनेक बंडले पोलिसांनी हस्तगत केली आहेत, तर त्यातील मुख्य आरोपी तुकाराम धवळू डंबाळी, धवळू महादू डंबाळी, प्रभाकर धवळू डंबाळी, (रा. साखरे) व इतर दहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले असून, गावकऱ्यांनी पकडून ठेवलेल्या सहा जणांना पोलिसांनी घटनास्थळी अटक केली. या प्रकरणी गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अघोरी प्रकार गेल्या महिन्याभरापासून सुरू होता. गुरुवारी सकाळी गावात झालेल्या मृतावर अत्यसंस्कार करण्यासाठी गावकरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. या वेळी पूर्वी दफन केलेल्या प्रेताचे अवशेष उकरून काढून कवटय़ा, हातापायांची हाडे पैशाचा पाऊस पाडण्याच्या अघोरी प्रकारासाठी वापरत असल्याचे गावकऱ्यांना दिसून आल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आणि त्यांनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या ठिकाणी जाऊन हा प्रकार उधळून लावला. या वेळी काही जण पळून जाण्यास यशस्वी झाले. त्यांचा अधिक तपास विक्रमगड पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर करीत आहेत. याबाबत पैशाचा पाऊस पाडण्याचे मोठे रॅकेट या भागात कार्यरत असल्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुख्य आरोपी बेपत्ता साखरे येथील विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूच्या घनदाट जंगलात तुकाराम डंबाळी यांच्याकडे पैशाचा पाऊस पाडण्यात येणार होता. त्यासाठी आलेले अमोल करांडे (भिवंडी), नंदकुमार ठाकरे (वाडा), किशोर कडू (गुजरात), पांडुरंग दापट (मोखाडा), भारती जसुंधा जोसेफ (पालघर), जयश्री पांचाळ (पालघर) यांना विक्रमगड पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी तुकाराम डंबाळी मात्र बेपत्ता झाला.