तीन दिवसांच्या पावसात दिव्यातील रस्त्यांची चाळण नगरसेवकांची संख्या दोनवरून अकरा झाली असली तरी दिवा शहरातील नागरिकांचे हाल सुरूच आहेत. विविध नागरी समस्यांना तोंड देत असलेल्या दिवेकरांना अवघ्या तीन दिवसांच्या पावसात शहरातील रस्त्यांची दुर्दशा अनुभवायला मिळत आहे. एरवी दिव्यातील रस्ते खराब अवस्थेतच असतात. परंतु, गेल्या तीन दिवसांतील पावसामुळे येथील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून येथे रस्ता होता की नाही, असे विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पावसामुळे येथील रस्त्यांवर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की पादचाऱ्यांनाही त्यावरून चालणे कठीणप्राय बनले आहे. दिवा शहरातील जवळपास सर्वच अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली असली तरी मुंब्रा कॉलनी रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यातही दीड ते दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर पायी वाट काढता येईल, इतकीही जागा शिल्लक नाही. त्यामुळे पादचाऱ्यांचा पाय एकतर चिखलात जाईल, अथवा पाणी साचलेल्या खड्डय़ात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात हा रस्ता पायी चालणाऱ्यांसाठी जवळपास बंद झाल्यात जमा आहे. पाण्यातून माग काढणाऱ्या होडीसारखी शेअर रिक्षा कशीबशी हेंदकाळत जाते. पाच-दहा मिनिटांच्या या दिव्य प्रवासादरम्यान नागरिक रिक्षात जीव मुठीत धरून बसलेले असतात. या भागात राहणारे बरीचशी मंडळी कष्टकरी, कनिष्ठ वर्गातील आहेत.वरकरणी येथील खोल्यांचा सौदा स्वस्त वाटत असला तरी येथील जगणे अतिशय महाग असल्याचे या चाळींमध्ये राहणाऱ्या एकाने सांगितले. इथे दोन दिवसांनी एकदा पाणी येते. ते साठवून ठेवावे लागते. त्यातलेच पाणी उकळून पिण्यासाठी वापरले जाते. विजेचा लपंडाव तर सातत्याने सुरू असतो. पावसाची संततधार असेल तर घरात पाणी शिरण्याची भीती असते. त्यामुळे रात्री झोपही लागत नाही. त्यात आता खड्डे आणि चिखलांमुळे रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली. रिक्षांचेही नुकसान लहान-मोठय़ा खडीने भरलेल्या या रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षांचेही बरेच नुकसान होते. दर दोन दिवसांनी गाडीचे काही ना काही काम निघते. कमवायचे चार आणे आणि खर्च करायचा रुपया असा प्रकार आहे. त्यामुळे पावसाळ्यात सरळ रिक्षा बंद ठेवून अन्य काहीतरी उद्योग करण्याच्या विचारात असल्याचे एका रिक्षाचालकाने सांगितले. आयुक्तांना निमंत्रण घोडबंदर परिसरातील नव्या ठाण्यातील विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करणाऱ्या महापालिका आयुक्तांनी कधीतरी दिव्यातील रस्त्यांचीही अवस्था पहावी, या रस्त्यांचीही तातडीने दुरुस्ती करावी, अशी कळकळीची विनंती येथील रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, दिव्यातील रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासन तातडीने शक्य त्या सर्व उपाययोजना करेल, अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.