वसई-विरार महापालिकेचा प्रकल्प; रहिवासी सोसायटय़ांना कचराकुंडय़ा पुरवणार वसई-विरार महापालिकेने ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रहिवासी सोसायटय़ांना पालिकेने कचराकुंडय़ा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरार शहरातून दररोज हजारो टन कचरा जमा होतो. ओला आणि सुका कचरा एकत्रित गोळा करून तो क्षेपणभूमीत टाकला जातो. त्यामुळे तेथील अपुरी जागा आणि दरुगधीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यासाठी महापालिकेने रहिवासी सोसायटय़ांमधील ओला कचरा गोळा करून त्यापासून खत तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सोसायटय़ांना ओला कचरा गोळा करण्यासाठी वेगळी कचराकुंडी दिली जाणार आहे. सॅटेलाइट सिटी उपक्रमांतर्गत महापालिकेला ११ हजार ६०० कचराकुंडय़ा मिळालेल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात या कुंडय़ा मिळाल्यानंतर त्या सर्व रहिवासी सोसायटय़ांना देण्यात येतील. आम्ही हा ओला कचरा गोळा करून तो पापडखिंड धरणाजवळील जागेत टाकून त्यापासून खतनिर्मिती करणार आहोत, असे महापौर प्रविणा ठाकूर यांनी सांगितले. किती ओला कचरा जमा होतो आणि किती खत तयार होते याचा आढावा घेऊन या उपक्रमाची व्याप्ती वाढवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. रहिवाशांनी ओला कचरा वेगळा जमा करावा यासाठी पालिका एक चित्रफीत बनवून त्याद्वारे नागरिकांचे प्रबोधन करणार आहे.