डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांचा महापालिकेत समावेश करण्यास विरोध करत अगदी काल-परवापर्यंत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने खडे फोडणाऱ्या २७ गाव संघर्ष समितीच्या नेत्यांनी गुरुवारी सायंकाळी नरमाईची भूमिका घेत पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी संघर्ष समितीच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. महापालिका नको या मागणीसाठी अडून बसलेल्या संघर्ष समितीच्या नेत्यांचे मनपरिवर्तन करण्यात राज्य सरकारला यश येत असल्याचे या घडामोडीवरून स्पष्ट होत आहे, अशी चर्चा येथील रंगली आहे. डोंबिवलीलगत असलेली २७ गावे महापालिकेत समाविष्ट करावीत यासाठी पालकमंत्री एकनाथ िशदे सुरुवातीपासून आग्रही होते. राज्य सरकारनेही हीच भूमिका घेतल्यानंतर संघर्ष समितीचे नेते व शिंदे यांच्यात बिनसल्याचे चित्र होते. २७ गावांत घेतल्या जाणाऱ्या विविध बैठकांत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात होती. मात्र गुरुवारी संघर्ष समितीच्या नेत्यांनी आपली तलवार म्यान करत एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी यासंदर्भातील अध्यादेशाची शुक्रवारी सकाळी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर होळी करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला होता. पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी या आंदोलनाची माहिती पालकमंत्री शिंदे यांना दिल्यानंतर त्यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संघर्ष समितीचे गंगाराम शेलार, गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, अर्जुनबुवा चौधरी, बळीराम तरे, वंडार पाटील आदी पदाधिकारी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. या बैठकीत समितीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले. येत्या आठवडय़ात ही बैठक होण्याची शक्यता आहे.शिवसेनेची नजर निवडणुकीवर२७ गावांमध्ये पालिकेचे आठ प्रभाग असणार आहेत. गावकऱ्यांनी पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकला तर गावे पालिकेत समाविष्ट करून घेण्याची सगळी मेहनत फुकट जाणार आहे. याची जाणीव झाल्याने एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात पुढाकार घेत संघर्ष समितीसोबत चर्चा सुरू केल्याचे समजते.