तामिळनाडूमध्ये राहणाऱ्या १२ वर्षीय शक्तीला ‘इंटरनॅशनल चिल्ड्रन पीस प्राईज’ अर्थात लहान मुलांसाठी देण्यात येणाऱ्या शांततेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. याआधी हा पुरस्कार मलाला युसूफझाईला देण्यात आला होता. शक्तीने आपल्या जमातीतील अनेक मुलांना सुक्षिशिक्षत करण्यासाठी धडपड केली. शक्तीच्या प्रयत्नामुळे त्याच्या वयाच्या २५ मुलांना शिकण्याची आणि आपलं भविष्य घडवण्याची संधी मिळाली आहे.

शक्तीचा जन्म तामिळनाडूनधल्या भटक्या जमातीतील एका कुटुंबात झाला. त्याला सहा भावंडं आहेत. वडिलांनी त्याला शाळेत घातलं पण वयाच्या आठव्या वर्षीच शाळा सोडायचं त्याने ठरवलं. कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो भीक मागायचा किंवा कधी कधी पावही विकायचा. २०१४ मध्ये ‘हँड-इन हँड’ या स्वयंसेवी संस्थेचं लक्ष शक्तीकडे गेलं. शक्तीसारखी अनेक कुटुंब आहेत जी अशिक्षित आहे हे त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा सुरूवातीला त्यांनी शक्तीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं मन वळवलं. शक्तीला शिक्षणात अजिबात रस नव्हता, त्याने विरोध केला पण स्वयंसेवी संस्थेच्या कार्यशाळेत हळूहळू त्याचं मन रमू लागलं.

Viral Video : अन् कोहलीला मैदानातच भांगडा करण्याचा मोह अनावर

शिक्षणाचं महत्त्व त्याला तिथेच उमगलं. कार्यशाळेत अभ्यासाबरोबरच प्रत्येक मुलाला स्वच्छ आणि नीटनीटकं राहायला शिकवलं जायचं, जो मुलगा नीटनीटका यायचा त्यांना बक्षीस दिलं जायचं. यामुळे शक्तीची शिक्षणातली गोडी अधिकच वाढत गेली. त्याने गावाकडे जाऊन त्याच्याच वयाच्या इतर मुलांनाही शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. खरं तर मुलांचं शिक्षणाप्रती मन वळवणं खूप कठीण काम होतं, शक्तीलाही अडचणी आल्यात पण त्याने प्रयत्न सोडले नाही .त्याच्या प्रयत्नामुळे आज त्याच्या जमातीतील २५ मुलं शिक्षण घेत आहेत. ज्या जमातीतील असंख्य मुलं शिक्षणापासून वंचित होती किंवा ज्यांना शिक्षणात रस नव्हता अशा अनेक मुलांमध्ये शक्तीच्या प्रयत्नामुळे अभिरूची निर्माण झाली.

वाचा : भारतीय वंशाच्या मुलांची प्रेरणादायक कामगिरी, दीड वर्षांत झाला कोट्यधीश