एक जागरूक नागरिक म्हणून आपली घरं आणि त्यांच्या रचना यांच्याबद्दल सुरक्षितता असल्याची खात्री करून घेण्याची वेळ आली आहे. सांख्यिक आकडेवारीनुसार भारतात इमारती कोसळल्याने दरवर्षी २,६०० लोक (एका दिवसाला ७ मृत्यू) आपला जीव गमावतात. असं असलं तरी अद्याप या घटकाकडे तसं दुर्लक्षच केलं जातं. गळतीमुळे भिंतीमध्ये पाणी झिरपण्याकडे दुर्लक्ष केल्याने आणि पर्यायी पाणी गळती न थांबवल्याने इमारतींच्या रचना अगदीच कमकुवत होतात. ठरावीक वर्षांतून बांधकामाचं ऑडिट व्हायलाच पाहिजे. इमारतीला पडलेले लहानसहान तडे वेळीच भरले तर ते बांधकामाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित ठरतं. बांधकामासाठी जागरूक राहणं आणि अगदी बांधकामविषयक बारीक तक्रारी तपासत राहून त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय करणं हे आवर्जून करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक घरासाठी पाणी गळती हा एक मोठाच प्रश्न झालाय आणि दरवेळेस जोपर्यंत पावसाळा येत नाही तोपर्यंत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. पावसाचे टपोरे थेंब केवळ खिडकीतच नाहीत तर थेट बेडरूममध्ये, स्वयंपाकघरात किंवा बाहेरच्या खोलीत पडायला लागत नाहीत तोपर्यंत त्याकडे दुर्लक्षच होतं. घरमालक बऱ्याचदा घरातल्या काही भागांतील पाणी गळतीकडे दुर्लक्ष करतात. बाथरूम किंवा स्वयंपाकघराची जमीन किंवा बाहेरच्या बाजूने किंवा टेरेसवर येणारी ओल याकडे दुर्लक्ष केलं जातं. इमारतीवर ऊन आणि पाऊस यांचा सतत परिणाम होत असतो. याच्या परिणामांकडे काणाडोळा केला की भविष्यात मोठय़ा परिणामांना सामोरं जावं लागतं. पाणी गळती तुमचं दुरुस्ती काम, रंगकाम तर हे खराब करतंच, पण घरातल्या मंडळींचं आरोग्य आणि त्यांच्या बांधकामाचं आयुष्यही यामुळे धोक्यात येतं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी- भिंतींमध्ये पाणी मुरणं म्हणजे केवळ छप्पे, भिंतींवरचे आणि छतांवरून येणारे ओघळ एवढंच नाही. खरं तर याचे फारच अंतर्गत परिणाम होऊ शकतात आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. पाणी गळतीमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. पाणी गळतीमुळे होणाऱ्या दमट, कोंदट आणि खराब हवेमुळे भिंतींमध्ये पाणी मुरलं की त्याचे फुगवटे तयार होतात. यामुळे निर्माण होणाऱ्या कुबट आणि घाणेरडय़ा वासामुळे विशेषत: लहान मुलांना अस्थमा होतो. तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल तर तयार झालेल्या बुरशीमुळे आरोग्याचे आणखी प्रश्न उद्भवतात. अगदी फुप्फुसाचा हायपर सेन्सिटिव्हिटी प्नेयुमोन्टिससारखे त्रासही उद्भवू शकतात. याचा आणखी एक धोका म्हणजे श्वसनाचे विकार अगदी जिवावर बेतण्याएवढेही बळावू शकतात. इमारतीचे नुकसान- पावसाळ्यातील पाण्याची गळती रोखू न शकणारी बांधकामं आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात केली जातात असा आरोप बऱ्याचदा होत असतो. बाथरूममधील बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याने पाणी गळतीचा प्रश्न निर्माण होतो. बांधकाम होत असताना कुठल्या दर्जाचं सामान वापरलं जातंय याकडे कोणाचंही लक्ष नसतं. याच निकृष्ट दर्जाच्या सामानामुळे इमारतीच्या सांगाडय़ात पाणी मुरतं. बहुतांश गळती छताकडूनच होते. छताचा ढाचा सच्छिद्र असल्याने पावसाळ्यात तो लगेचच उघडा पडतो आणि छताकडून पाण्याला सहज प्रवेश मिळतो आणि पाणी भिंतींमध्ये मुरायला लागतं. आतापर्यंत पाणी गळतीचे उपाय पारंपरिक पद्धतीने म्हणजेच ब्रिकबॅट कोबा (बीबीसी)ने केले जात होते. परंतु आता नवनवीन प्रभावी उत्पादनं बाजारात आली आहेत. बाभिंती हा बांधकाम करणाऱ्यांकडून दुर्लक्षिला जाणारा आणखी एक घटक आणि बऱ्याचदा तिच्यावर पाणी गळतीचे उपाय केलेलेच नसतात, दिलेला असतो फक्त रंगाचा एक हात. याचे परिणाम म्हणजे, पाणी मुरणं ही प्रक्रिया बांधकामाच्या सौंदर्याचा बाधा आणतेच; परंतु त्याही महत्त्वाचे म्हणजे भिंतीतून पाणी झिरपल्यामुळे घरातलं लाकडी सामान खराब होतं आणि वायरमधून पाणी गेल्याने इलेक्ट्रिक शॉक सर्किटसारखे धोकेही संभवतात. दुरुस्ती करा- गळतीवर उपाय करणं हे खरं मोठं आव्हान आहे. परंतु बाजारातील नवनवीन उपायांमुळे हे शक्य होते. पाणी गळती आणि पाणी मुरणं या केवळ अल्पावधीसाठीची गैरसोय आहे असं वाटू शकतं. परंतु त्याचे परिणाम मात्र भयंकर असतात. भिंतीमधील पाणी गळतीवर योग्य उपाययोजना करून दमट भिंती, छत, वाढता कुबटपणा, भेगा आणि गळतीला रामराम ठोकूया. (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, कन्स्ट्रक्शन केमिकल्स,पीडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड.)