‘अच्छे दिन आयेंगे’चे स्वप्न दाखवत केंद्रात आलेले भाजपप्रणीत मोदी सरकार आणि यापूर्वीचे काँग्रेसप्रणीत यूपीएचे सरकार यांच्या राजकीय, आर्थिक धोरणात तिळमात्रही फरक नाही, अशी टीका माकपच्या नेत्या वृंदा कारत यांनी केली.सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या प्रचारार्थ आल्यानंतर शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना करात यांनी काँग्रेस व भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची ‘सर्वाधिक अपयशी गृहमंत्री’ अशी संभावना केली. मोदी सरकारची वाटचाल गरिबीच्या विरोधात नव्हे तर गरिबांच्या विरोधात आणि श्रीमंतांच्या बाजूने आहे, अशा शब्दात वृंदा करात यांनी टीकास्त्र सोडले.