‘दिव्यांचा उत्सव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास सोमवारी गाय-वासरू पूजन अर्थात वसुबारसने उत्साहात सुरुवात झाली. आकर्षक रोषणाई, पणत्यांची आरास, आकाशकंदील यांच्या लखलखाटाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्र प्रकाशमय झाला आहे. दीपावलीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणून गणला जाणारा लक्ष्मीपूजन दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. प्रमुख बाजारपेठांमध्ये केरसुणी, पणत्या व फुल विक्रेत्यांचे साम्राज्य पसरले असून सर्वच बाजारपेठा गजबजल्या आहेत. यंदा प्रकाशाचा हा उत्सव सलग पाच दिवस रंगणार आहे. गत काही वर्षांत एकाच वेळी दोन दिवस येत असल्याने या उत्सवाचे दिवस कमी-अधिक होत असत. परंतु यंदा दीपोत्सवाचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. हिंदू संस्कृतीत गायीला असणारे महत्त्व लक्षात घेता सोमवारी ठिकठिकाणी गाय आणि वासरूचे सुग्रास नैवेद्य दाखवत पूजन करण्यात आले. मात्र काही ठिकाणी गाय न मिळाल्याने गायीच्या प्रतिरूपाला म्हणजे धातूच्या गायी आणि वासरूची पूजा करत दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली. सराफी पेढीत यानिमित्ताने शुद्ध चांदीच्या गायी अगदी एक इंचापासून एक किलो वजनापर्यंत भरीव स्वरूपात आणण्यात आल्या आहेत. तसेच व्हाइट मेटल, ऑक्साइड या अन्य धातूंच्या गायींना विशेष मागणी राहिली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठांची अवस्था अद्याप ‘जैसे थे’ अशीच आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत त्यात तसूभरही कमतरता आली नाही. नाशिककरांच्या खरेदीला उधाण आले आहे. कपडे, फटाके, उटणे, सुगंधी तेल, अत्तर यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची मुख्य बाजारपेठेसह शहरातील अन्य ठिकाणी गर्दी केली. तसेच अंगणातील रांगोळीचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यामध्ये पाण्यातील रांगोळीचे सामान, रंगीत रांगोळी, संस्कार भारतीचे विविध प्रकारचे छापे, लक्ष्मीची पावले आदींना ग्राहकांकडून मागणी आहे. पांढऱ्या रांगोळीचे भाव दुपटीने वाढले असून २०-२५ रुपये किलोने साध्या रांगोळीची विक्री होत आहे. ग्राहकांनाही एकाच छताखाली हे सर्व उपलब्ध व्हावे यासाठी व्यावसायिकांनी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत फटाके, पणत्या, पूजेचे साहित्य, रंग-रांगोळी आदींचे खास ‘पॅकेज’ उपलब्ध करून दिले आहे.