एमआयडीसीने विधानसभेच्या आचारसंहितेच्या नंतर मागील महिन्यात एकच दिवस अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. मात्र यानंतर कारवाई थंडावल्याने दिघा परिसरात भूमाफियाचे चांगलेच फावले आहे. एमआयडीसीने केलेल्या कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच पुनश्च अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे दिघा परिसरात मुंब्र्यासारखी घटना घडल्यास एमआयडीसीला जाग येणार का, असा सवाल दक्ष नागरिकांनी उपस्थित केला आहे. एमआयडीसीने मागील महिन्यात गणपती पाडा, दिघा, रबाळे एमआयडीसी परिसरात आरक्षित भूखंडांवर वसलेल्या इमारती आणि झोपडय़ांवर कारवाई करत जमीनदोस्त केल्या. दिघा परिसरात स्मशानानजीक एका इमारतीवर कारवाई करून ती पूर्णत: जमीनदोस्त केली. तर दिघ्यातील शनीमंदिराजवळ असलेल्या राजकीय नेत्याच्या इमारतीवर केवळ दिखाव्यापुरती कारवाई केल्याने अधिकाऱ्यांची पाठ फिरताच या ठिकाणी पुन्हा इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीची ही मोहीम नेमकी कशासाठी होती असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एमआयडीसीच्या आधिकाऱ्यांना कारवाईदरम्यान आलेल्या राजकीय दबावापोटी ही कारवाई थंडावल्याचेदेखील नागरिकांचे म्हणणे आहे.

दिघा येथे एमआयडीसीच्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली होती; परंतु या ठिकाणी पुन्हा इमारती उभ्या राहिल्या असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
अविनाश माळी, उपकार्यकारी अभियंता, एमआयडीसी.