रक्षाबंधन आणि विलंबाने झालेल्या पावसामुळे शेतीच्या कामात गर्क असणारा शेतकरी वर्ग याचा परिणाम यंदा तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या प्रदक्षिणेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या कमी होण्यात झाल्याचे पाहावयास मिळाले. या दिवशी दुपापर्यंत भाविकांचा ओघ कायम असला तरी त्यांची संख्या केवळ दोन लाखांपर्यंतच मर्यादित राहिली. रविवारी मध्यरात्री ‘ब्रह्मगिरी’ला प्रदक्षिणा मारण्यासाठी चढाई करणाऱ्या भाविकांची सोमवारी सकाळपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी तब्बल ४०० बसेसचा ताफा सज्ज ठेवून अविरत फेऱ्या मारत लाखो रुपयांचे उत्पन्न कमाविले. खासगी वाहतुकीला पूर्णत: अटकाव घालत पोलिसांनी त्र्यंबकेश्वरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला. मोफत खानपान देण्यासाठी सरसावलेले लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी आपल्या उपक्रमाचा डीजेच्या दणदणाटात डंका पिटल्याने त्र्यंबक नगरीला कर्णकर्कश गोंगाटाला सामोरे जावे लागले.
श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे, त्र्यंबकेश्वरात लाखो भाविकांची मांदियाळी हे समीकरण तसे रूढ झालेले. या दिवशी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी तीन ते पाच लाखांपर्यंत भाविक दरवर्षी येथे दाखल होतात. यंदा मात्र भाविकांची संख्या नेहमीच्या तुलनेत बरीच कमी झाल्याचे दिसून आले. साधारणत: दोन लाख भाविक प्रदक्षिणेत सहभागी झाल्याचा पोलीस यंत्रणेचा अंदाज आहे. ही संख्या कमालीची घटण्यामागे रक्षाबंधनाच्या दिवशी आलेला तिसरा सोमवार हे मुख्य कारण ठरले. राखी पोर्णिमेमुळे अनेकांनी त्र्यंबकेश्वरला जाणे टाळले. नेहमीपेक्षा यंदा पावसाचे दीड ते दोन महिने विलंबाने आगमन झाले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी वर्ग पेरणीच्या कामात गर्क आहे. नेहमी हे काम श्रावण महिन्याच्या आधीच होऊन जाते. त्याचाही भाविकांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे दिसत होते.
पोलीस यंत्रणेने प्रदक्षिणा मार्गासह मंदिर व एकूणच त्र्यंबक नगरीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खासगी वाहनांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यंदा या कालावधीत हा मार्ग खासगी वाहनांसाठी बंद करण्यात आला. त्याकरिता ठिकठिकाणी अडथळ्यांद्वारे रस्ते बंद करून खासगी वाहने या मार्गावर येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली. खासगी वाहनांना प्रवेशबंदी असल्याने भाविकांना नाशिकहून त्र्यंबकेश्वरला ने-आण करण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाने नेटाने पार पाडली. भाविकांसाठी ४०० हून अधिक बसेस सोडण्यात आल्या. काही वर्षांपूर्वी बसेसची संख्या कमी असल्याने भाविक टपावर बसून प्रवास करत होते. यंदा तसे चित्र दिसले नाही. त्र्यंबकच्या मेळा स्थानकावर मातीचा भराव टाकण्याचे काम सोमवारी महामंडळाने हाती घेतले. बसची ये-जा सुरू असताना हे काम करण्यात आले. प्रशासनाने पूर्वतयारी केली नसल्याने भाविकांना समस्यांना तोंड द्यावे लागले.
रविवारी मध्यरात्री ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला ‘बम् बम् भोले’च्या गजरात सुरुवात करणारे हजारो भाविक सोमवारी पहाटे त्र्यंबकेश्वरात दाखल झाले. या दिवशी पाऊस नसला तरी प्रदक्षिणा मार्गावर सर्वत्र चिखल आहे. त्यामुळे चालणे अवघड ठरले. प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या थकलेल्या व आजारी भाविकांना सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रुग्णालयात पोहोचविण्याचे काम केले. फेरीमार्गावर भाविकांना चहा, नाश्ता, फराळाचे पदार्थ व फळे मोफत देण्यासाठी नाशिकचे काही नगरसेवक, सामाजिक संस्था व मंडळांची चढाओढ सुरू होती. भलामोठा फलक लावून डीजेच्या दणदणाटात खाद्यपदार्थाचे वितरण केले जात होते. यामुळे ब्रह्मगिरीच्या परिसरात कमालीचा गोंगाट होता. प्लास्टिक, कागदी द्रोण व थाळी अस्ताव्यस्त फेकल्या जात असल्याने सर्वत्र कचऱ्याचा खच पसरला. प्रदक्षिणेसाठी निघताना घुमणारा ‘बम् बम् भोले’चा गजर कायम असला तरी परतताना भाविकांचा थकवा स्पष्टपणे जाणवत होता.