मांडवावरील वेलीवर उगवलेले दुधी भोपळे, रोपटय़ाला लगडलेली भरघोस वांगी, मिरच्या, काकडी, तोंडली, अळू अशा विविध प्रकारच्या भाज्यांचा मळा ठाण्यासारख्या शहरात इमारतीच्या गच्चीवर करता येतो, हे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय साठे यांनी दाखवून दिले आहे. व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर ७४ वर्षीय साठे आता ‘उत्तम शेती’कडे वळले असून आपल्याच इमारतीच्या गच्चीत त्यांनी मळा फुलविला आहे. ठाणे स्थानकाजवळ बी केबिन परिसरात त्यांचा हा मळा आहे. दत्तात्रय यांचे आई-वडील कोकणातील लोटे परशुराम मंदिराचे कारभारी होते. पुढे ते गुहागरजवळील माळघर शिरळ येथे स्थायीक झाले. अतिशय सुखवस्तू अवस्थेत असलेल्या दत्तात्रय साठेंना वडिलांच्या निधनानंतर मात्र जगण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. मात्र दत्तात्रय यांच्या आईने शेतीच्या जोरावर आपल्या सर्व मुलांचे पालनपोषण केले. शेतीचे संस्कार हे त्या वेळीच त्यांच्यावर झाले होते. मात्र आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी साठे मुंबईला आले आणि औद्योगिक व्यवसायामध्ये त्यांनी स्वत:ला गुंतून घेतले. मालकीची कंपनी सुरू केली. त्यांचे शेतीबद्दलचे आकर्षण मात्र कायम होते. निवृत्तीनंतर त्यांचे मुलांसोबत अमेरिकेला जाणे वाढले. तिथे मातीशिवाय केली जाणारी शेती पाहून ते अचंबीत झाले. भारतात परतल्यावर अशीच शेती करण्याचा विचार त्यांनी केला आणि सहा महिन्यांपूर्वी त्यांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली. गच्चीच्या छोटय़ा जागेत त्यांनी ही बाग साकारली. जुन्या वस्तू, विटा, लाकडाचे तुकडे यांच्यासारख्या टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी वाफे तयार केले आणि त्यात रोपे लावली. त्यांच्या या प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा खूप लवकरच यश आले. दत्तात्रय साठे यांनी छंद किंवा आवड म्हणून ही बाग फुलवली असली तरी गरजूंना अशा प्रकारच्या उपक्रमातून चांगले उत्पन्नही मिळू शकते. शिवाय बागेत काम करताना, ती फुलताना मिळणाऱ्या आनंदाचे मोल करताच येणार नाही. गुरुत्वाकर्षणाचा लागवडीसाठी फायदा..गच्चीवरील या बागेत रोप लागवडीसाठी दत्तात्रय साठे यांनी गुरुत्वाकर्षण तत्त्वाचा वापर केला आहे. काकडी, दुधी यांच्या वेलींची लागवड उंचीवर टांगलेल्या कुंडीत केली आहे. त्यामुळे खाली पसरणाऱ्या वेलीची वाढ जलद होते.