देशातील विमा क्षेत्राने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक स्थित्यंतरे पाहिली. विमा क्षेत्राची कवाडे खासगी क्षेत्राला खुली होऊनही आता दशकाहून अधिक कालावधी लोटला आहे. व्यवसाय सुलभ आणि विमाधारकांचे हित याकरिता या क्षेत्रातील नियम अधिक सुटसुटीत करण्यात आली. या क्षेत्रातील कंपन्यांना आता भांडवली बाजाराचा मार्गही उपलब्ध होत आहे. थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादाही विस्तारण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर देशातील आरोग्य विमा क्षेत्राच्या विद्यमान व भविष्यप्रवासावर क्षेत्रातील नवा खेळाडू सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सच्या मुख्य वितरण अधिकारी ज्योती पुंजा यांनी टाकलेली नजर झ्र्

२०१५ हे कॅलेंडर व २०१५-१६ हे आर्थिक वर्षही नुकतेच संपले. या दरम्यान भारतातील विमा क्षेत्राचा प्रवास कसा राहिला आहे?

दोन्ही वर्षांसाठी देशातील एकूण विमा उद्योग भरभराटीचा राहिला आहे. जीवन तसेच आरोग्य विमा क्षेत्राच्या वाढीतील सातत्य कायम राहिले आहे. टक्केवारीत दुहेरी आकडय़ातील वाढ हे क्षेत्र नोंदवित आहे. ४० टक्के अशी त्याची वाढ सांगता येईल.

  • देशातील आरोग्य विमा क्षेत्रात सिग्ना टीटीके ही तशी नवी कंपनी. तिचा व्यवसायवेग कसा राहिला?

सिग्ना आणि टीटीके यांच्या भागीदारीतील आरोग्य विमा व्यवसायाचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे आहे. आमच्या दृष्टीने २०१५-१६ हे खऱ्याअर्थी परिपूर्ण वर्ष राहिले आहे. आतापर्यंत आम्ही १४४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आमच्या विमाधारकांची संख्याही दोन लाखाच्या वर गेली आहे.

  • कंपनीचे विद्यमान आर्थिक वर्षांसाठी काय ध्येय राखले आहे?

या वर्षांत आम्ही एकूण १४४ कोटी रुपयांच्या उलाढालीचे लक्ष्य राखले आहे. वितरण जाळेही विस्तारण्याचा आमचा या वर्षांतील प्रयत्न कायम असेल. त्याचबरोबर या क्षेत्रात धारकाला आवश्यक अशा अधिकाधिक उत्पादनांची मालिकाही येत्या कालावधीत येतच राहिल. आमच्या ११ शाखा, ४१ ठिकाणचे अस्तित्व आणि १३,००० विमा प्रतिनिधी यांच्या सहाय्याने हा व्यवसाय आणखी वृद्धींगत करण्याचे उद्दीष्ट आमचे आहे.

  • या क्षेत्रातील कंपन्या आता लवकरच खुला होणाऱ्या भांडवली बाजाराकरिता आणि विस्तारित थेट विदेशी गुंतवणुकीकरिताही सज्ज आहेत. पैकी तर अनेकांची त्यासंबंधीची आखणी झाली आहे. सिग्ना टीटीकेची तशी काही योजना आहे काय?

निश्चितच. भांडवली बाजारातील विमा कंपनीच्या प्रवेशाबाबत तूर्त काही सांगणे खूपच घाईचे ठरेल. आणि विदेशी भागीदार कंपनीच्या भागीदारी कंपनीत हिस्सा वाढीबाबत सांगायचे झाले तर याबाबतची चर्चा अद्याप सुरू आहे. लवकरच त्यावर निश्तिच काही स्पष्ट होईलच.

  • विमा क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. तेव्हा त्यासाठी तग धरून ठेवताना नवोदित कंपनी म्हणून काय उपययोजना आहेत?

या क्षेत्रात अनेक नवे खेळाडू येत आहेत. तेव्हा विमाधारकाला केंद्रीत ठेवून उत्पादनांची मांडणी व्हायला हवी. विमाधारकाचे हित समोर ठेवून व त्याची विद्यमान रचनेत भागविणारी गरज लक्षात ठेवून विमा योजना तयार व्हायला हव्यात. अर्थातच आमची विमा उत्पादने ही आरोग्य क्षेत्रातील आहेत. सर्वसाधारणपणे रुग्णालयातील शस्त्रक्रिया आदी महत्त्वाच्या बाबींवर रुग्णाचा २३ टक्क्य़ांपर्यंतचा खर्च होतो. मात्र अन्य अधिक वाटा असलेल्या बाबी अधिकतर आरोग्य विमा योजनांमध्ये गृहितच धरल्या जात नाहीत. मध्यमवर्गीय म्हणा अथवा उच्च मध्यमवर्गीयाला हा अतिरिक्त आर्थिक भारही पेलणे सोपे व्हावे अशा योजना आमच्याद्वारे अशाप्रकारे उद्योगात प्रथमच अवतरल्या आहेत. शिवाय बचत आणि लाभांशाची जोडही काही उत्पादनांमध्ये धारकाला आहे. आम्ही तर आता आयुश, युनानी, योगा या आरोग्य क्षेत्राशी निगडित अन्य उपचारपद्धतीही विमाछत्रात समाविष्ट केली जात आहे.

  • विमा क्षेत्राच्या सुलभतेकरिता नियामकाद्वारे काही बदल गेल्या काही कालावधीत झाले आहेत..

विमा नियामकाचे नियम हे शेवटी धारकाला मिळणाऱ्या सुलभ सेवेकरिताच आहेत. पोषक स्पर्धात्मक वातावरणही त्यामुळे निर्माण होते. कंपन्यांना विमा योजना आता बँक तसेच ई-मंचावरही उपलब्ध करून देणे सोपे होऊ लागले आहे. अनेक कंपन्या आता या मंचाचाही त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांची उत्पादने अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या रितीने उपयोग करून घेता येत आहे.

  •  विम्याचे छत्र पुरेशा प्रमाणात नाही. त्याच्या प्रसाराकरिता पुढाकार घेण्याबाबत काय सांगाल?

हे खरे आहे. मात्र आज त्याबाबतची जनजागृती वाढते आहे. आम्हीही आरोग्य शिबिरे, शैक्षणिक उपक्रम तसेच विविध क्षेत्रीय भाषेतून उत्पादनांची माहिती, दृकश्राव्य माध्यमांतून माहितीचे आदान-प्रदान याद्वारे विम्याकरिता कार्यरत आहोत.

विमाधारकाला केंद्रीत ठेवून उत्पादनांची मांडणी व्हायला हवी. विमाधारकाचे हित समोर ठेवून व त्याची विद्यमान रचनेत भागविणारी गरज लक्षात ठेवून विमा योजना तयार व्हायला हव्यात. सर्वसाधारणपणे रुग्णालयातील शस्त्रक्रिया आदी महत्त्वाच्या बाबींवर रुग्णाचा २३ टक्क्य़ांपर्यंतचा खर्च होतो. मात्र अन्य अधिक वाटा असलेल्या बाबी गृहितच धरल्या जात नाहीत.