देशात आजपासून (१ जुलै) बँकिंग नियमांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहे. हे नवे बदल बँकांमध्ये जमा असलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजापासून एटीमधून पैसे काढण्यासोबतच मिनिमम बँलंसशी निगडित आहेत.

आजपासून खातेधारकांना एटीममधून पैसे काढल्यानंतर देण्यात येणारी सुट बंद करण्यात आली आहे. करोना काळात सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान बँकांनी ही सुट दिली होती. आता पूर्वीप्रमाणेच मेट्रो शहरांमध्ये आठ आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये १० ट्रान्झॅक्शन करण्याचीच परवानगी असणार आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांना एटीएममधून अमर्याद वेळा पैसे काढण्याची मुभा देण्यात आली होती.

खात्यात मिनिमम बॅलन्स अनिवार्य

खात्यात आता मिनिमम बॅलन्स ठेवणं अनिवार्य असणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ३० जून पर्यंत या नियमातही बदल केला होता. मात्र, आता हा कालावधी संपला असल्यानं पुन्हा खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मेट्रो शहर, शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा निरनिराळी आहे.

व्याजदर कमी

ग्राहकांना मिळणाऱ्या व्याजदरातही आजपासून बदल करण्यात आला आहे. सर्वाधिक बँकांनी बचत खात्यांवर मिळणाऱ्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजात ०.५० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. तर अन्य सरकारी बँकांमध्येही सर्वाधिक ३.२५ टक्के व्याज मिळणार आहे.

खातं गोठवणार

ज्या ग्राहकांची कागदपत्रे नाहीत, अशा ग्राहकाचं खातं आता गोठवलं जाणार आहे. बँक ऑफ बडोदासोबतच विजया बँक आणि देना बँकेतही हे नियम लागू आहेत. विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनिकरण करण्यात आलं आहे.