माहिती नसल्याची रिझव्‍‌र्ह बँकेचीच कबुली

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ज्या कारणासाठी ५०० व १००० रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला, त्यापैकी एक प्रमुख कारण हे बनावट नोटांचा बीमोड करण्याचे होते; परंतु निश्चलनीकरणाच्या या कालावधीत अशा किती बनावट नोटा बँकांकडे जमा केल्या जात असताना सापडल्या, याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याची खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेनेच कबुली दिली आहे.

मुंबईस्थित माहिती हक्क कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल रिझव्‍‌र्ह बँकेने माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. १० डिसेंबर २०१६ पर्यंत बँकांकडे जुन्या नोटा जमा केल्या जात असताना, ५०० व १००० रुपयांच्या किती बनावट नोटा बँकांना सापडल्या, असा गलगली यांचा प्रश्न होता.

यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने निश्चलनीकरणाचा निर्णय  ८ नोव्हेंबर २०१६ ला जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारकडून सल्लामसलतीच्या प्रक्रिया केव्हापासून सुरू झाली आणि त्या प्रक्रियेचा तपशीलही माहिती अधिकाराखाली देण्यास अर्जदाराला नकार दिला आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयानेही असा तपशील देण्यास इन्कार केला आहे. देशाचे मुख्य अर्थसल्लागार आणि अर्थमंत्र्यांशी तरी या निर्णयाची पूर्वकल्पना दिली गेली होती काय, अशा प्रश्नाला पंतप्रधान कार्यालयाने बगल दिली आहे.