एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग खासगी कंपन्यांना विकण्याचा सरकारचा मानस असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज (शनिवार) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी ही माहिती दिली. यावरुनच आता आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजपा सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

काय म्हणाल्या सीतारामन?

एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला हिस्सा विकण्याचा प्रस्ताव सरकारसमोर असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. “एलआयसी आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. एलआयसीचा आयपीओ आणला जाणार आहे,” असं सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. त्यामुळे लवकरच एलआयसीचे खासगीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

मेवाणी यांचा टोला

सीतारामन यांनी एलआयसीचे समभाग विकण्याची माहिती दिल्यानंतर मेवाणी यांनी ट्विटवरुन भाजपा सरकारवर टीका केली आहे. “रेल्वेचे खासगीकरण.. एअर इंडियाचे खासगीकरण… एलआयसीचे खासगीकरण… देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांची संपूर्ण जबाबदारी सरकारला झटकायची आहे. या लोकांना लाज राहिली नाही. आता कामगार, विद्यार्थी, गरीब व मध्यमवर्गीय यांनाही ही वस्तुस्थिती कळून चुकेल,” असं मेवाणी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतानाचा विरोधकांनी अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.