भांडवली बाजारातील शुक्रवारची अस्वस्थता लक्षात घेता गरज पडल्यास आवश्यक ती रोकड सुलभता राखण्यासाठी निधी ओतण्याची योजना तयार असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी म्हटले आहे की, भांडवली बाजारात कमीत कमी अस्थिरता निर्माण व्हावी, असा आमचा प्रयत्न असेल.
भांडवली बाजारातील अपेक्षित अस्थिरतेचा सामना कसा करावयाचा याबाबतच्या आराखडय़ासंदर्भात अर्थ मंत्रालयाशीही चर्चा झाली आहे. तशी योजनाच आमच्याकडे तयार असल्याचेही ते म्हणाले. नव्या सरकारबाबत, विकास, वित्तीय तूट, चालू खात्यातील तूट व महागाई ही आव्हाने कायम असतील; तर महागाई कमी करण्यासाठी आमच्या परीने प्रयत्न म्हणून ती मार्च २०१६ अखेर ६ टक्क्यांपर्यंत आणण्याचे आमचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले.