मुंबई : जागतिक बाजारातील मजबूत संकेताच्या जोरावर प्रमुख निर्देशांक नववर्षांतील सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकारात्मक पातळीवर स्थिरावले. देशांतर्गत बाजारात अस्थिरतेचा सामना केल्यानंतर दोन्ही निर्देशांक सोमवारच्या तुलनेत वाढीसह बंद झाले.दिवसअखेर मुंबई बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२६.४१ अंशांनी वधारून ६१,२९४.२० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६१,३४३.९६ अंशांची उच्चांकी तर ६१,००४.०४ पातळीचा नीचांक गाठला. मात्र दिवसभरातील सत्रात सेन्सेक्स ६१,००० अंशाच्या पातळीवर कायम होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३५.१० अंशांची वाढ झाली आणि तो १८,२३२.५५ पातळीवर स्थिरावला. भांडवली बाजाराला चालना देणाऱ्या जागतिक घडामोडींच्या अभावाच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत भांडवली बाजाराने तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या कामगिरीकडे लक्ष केंद्रित केले आहे. चालू आठवडय़ापासून विविध क्षेत्रांतील कंपन्या डिसेंबर तिमाहीतील कामगिरीची आकडेवारी जाहीर करतील. यंदाच्या तिमाहीत कंपन्यांचे निकाल आधीच्या तिमाहीच्या तुलनेत चांगले राहण्याची आशा वर्तविली जात आहे. येत्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि बँकांच्या समभागांवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असेल, कारण या क्षेत्रांकडून मिळणाऱ्या संकेतांवरून बाजाराची पुढील दिशा निश्चित होईल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, टेक मिहद्र, इंडसइंड बँक, विप्रो, नेस्ले आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले, तर मिहद्र अँड मिहद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदूस्थान युनिलिव्हर आणि टाटा स्टीलच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २१२.५७ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.