सायरस मिस्त्री यांचा विश्वस्त संस्थेवरच घाला टाटा समूहावर पुन्हा शाब्दिक आरोप हल्ला चढविताना निष्कासित अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी सोमवारी सरकार हस्तक्षेपाकरिता आग्रह धरला. समूहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांचा उल्लेख टाळत मिस्त्री यांनी त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला. टाटा ट्रस्टच्या सुशासनातील दुरुस्ती आणि त्याच्या उपायासाठी आता सरकारच्या हस्तक्षेपाची गरज आहे, असे स्पष्ट करत मिस्त्री यांनी टाटा समूहावर कोणा एका व्यक्तीची मालकी नाही, असा इशारा दिला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना २४ ऑक्टोबर रोजी काढून टाकल्यानंतर समूहातील सहा कंपन्यांची विशेष सर्वसाधारण सभा चालू डिसेंबरमध्ये बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात सायरस मिस्त्री यांनी भागधारकांना, आपण तसेच नसली वाडिया यांना कंपन्यांमधून बाहेर काढण्याच्या प्रस्तावाविरुद्ध मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मिस्त्री यांना टाटा सन्सचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांचे नाव न घेता, ‘टाटा सन्सबाबतचे सर्व अधिकार हे एकाच व्यक्तीच्या हातात एकवटले आहेत. टाटा सन्समधील आपसातीलच एक जण ‘हाय कमांड’ आहे. ही व्यक्ती अनैतिक, अयोग्य आणि विश्वासघातकी आहे’, अशी शाब्दिक आगपाखड पत्रात व्यक्त केली आहे. टाटा ट्रस्टने अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह असायला हवे, असेही मिस्त्री यांनी सुचविले आहे. टाटा ट्रस्टच्या शाश्वततेकरिता सुशासन सुधारणा नितांत गरजेच्या असल्याचेही मिस्त्री यांनी म्हटले आहे. कंपनी कायदा आणि जागतिक स्तरावर होणारे बदल लक्षात घेता सर्व भागधारकांच्या हितार्थ, त्यांच्या संरक्षणार्थ टाटा समूह तसेच तिच्या उपकंपन्या यामध्ये बदल होणे गरजेचे असल्याचेही नमूद केले आहे. टाटा समुहाविरुद्ध मिस्त्री यांनी सोमवारी केलेले आरोप हे त्यांच्या जुन्याच वक्तव्याचे नवे रुप आहे. समुहात गेल्या १०० वर्षांहून अधिक कालावधीपासून सुशासन आहे. उलट अध्यक्ष बनताच मिस्त्री हे टाटा सन्स म्हणजे स्वत:ची जहागिरी असल्याप्रमाणे वागले. - टाटा सन्स. मिस्त्री आरोपानंतर सायंकाळी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात.