आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

मार्चअखेर ते एप्रिल महिन्याचा पूर्वार्ध हा समभागांच्या पोर्टफोलिओ अर्थात संच बांधणीसाठी अतिशय उत्तम काळ आहे असे वाटते, हाच धागा पकडत ही प्रक्रिया गेल्या लेखापासून सुरू केली. गेल्या लेखात सुचविलेल्या व आता सर्वतोमुखी असलेल्या बहुतांश समभागांनी अवघ्या तीन दिवसांत किमान १० व कमाल ३० टक्क्यांचा परतावा दिल्याने या धाग्याचे रूपांतर – गुंतवणूकदार व त्यांचा जिवाभावाचा, जवळचा समभाग संच अशा रेशमी दुव्यात झाले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

गुरुवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३१,१५९.६२ / निफ्टी: ९,१११.९०

गेल्या लेखात गडद मंदीच्या वातावरणात निर्देशांकावर एक सुधारणा अपेक्षित होती, जिचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० असेल. या वाक्याचे प्रत्यंतर सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी आले. यात निर्देशांकानी अवघ्या तीन दिवसांत दहा टक्क्यांचा परतावा तर दिलाच, पण त्याहून अधिक आकर्षक परतावा हा पुढील समभागांनी दिला. उदाहरणार्थ आयओएल केमिकल्स लिमिटेडनी ३२ टक्क्यांचा परतावा दिला (रु. १९३ वरून रु. २५६). सिप्ला लिमिटेडने २९ टक्क्यांचा (रु. ४४९ वरून रु. ५८०), नवीन फ्लोरिन लिमिटेडने २१ टक्क्यांचा (रु. १,२६७ वरून रु. १,५३४), एफडीसी लिमिटेड १९ टक्क्यांचा (रु. २०० वरून रु. २३८), अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केट लिमिटेड/ डी-मार्टने १५ टक्क्यांचा (रु. २,०६७ वरून रु. २,३९२), आयआरसीटीसी लिमिटेडने १५ टक्क्यांचा (रु. १,०८३ वरून रु. १,२५३) तेव्हा मंदीच्या हवालदिल वातावरणात समभाग संच बांधणीचा पकडलेला धागा अचूक होता हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले.

सरलेल्या सप्ताहातील बाजाराचे वर्तन काहीसे अतार्किक जरूरच होते. भारतातील झाडून सर्व औषध कंपन्यांना करोना विषाणूवर औषध सापडल्याचा आविर्भाव, याच हर्षोन्मादात निर्देशांकाची वरच्या दिशने होणारी जलद वाटचाल सुरू राहिली. त्यात आपल्या बाजाराला लाभलेली ‘संजयची दिव्यदृष्टी’ त्यामुळे आर्थिक, सामाजिक प्रश्न तर चुटकीसारखे सोडवू व आताच जर निफ्टीने १०,०००च्या स्तराला गवसणी घातली तर ‘भाऊ, भाऊ करोना म्हणजे काय रे?’ असेदेखील विचारू, थोडक्यात सर्व काही आलबेल आहे, अशा थाटातच बाजाराचे वर्तन राहिले. हीच सावध व्हायची वेळ आहे. येणाऱ्या दिवसांत सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० हा अवघड टप्पा आहे. या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून जिचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर २९,३५० ते २८,८७५ आणि निफ्टीवर ८,५०० ते ८,३०० अशी असेल.

समभाग संच बांधणीच्या प्रक्रियेत आताच्या घडीला कटाक्षाने टाळावयाची क्षेत्रे ही – बांधकाम, हवाई वाहतूक, वाहन उद्योग (या क्षेत्रातील काही कंपन्यांना आता व्हेंटिलेटर बनविण्यासाठी सुचविण्यात आलेले आहे त्यावरून या क्षेत्राची कल्पना येईल.) बँका, संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्र. ही आताच्या घडीला गुंतवणूक टाळावयाची क्षेत्रे असतील. या वर्षांच्या उत्तरार्धात या क्षेत्रातील कंपन्यादेखील आकर्षक मूल्यावर येतील. तेव्हा त्यांचा जरूर विचार करू.

समभाग संच बांधणीचे निकष : 

अशा कंपन्या निवडल्या ज्यांची उत्पादने नित्योपयोगी असतील यात अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केट / डी-मार्टने बाजी मारली. राधाकृष्ण दमाणी यांनी २००२ साली प्रवर्तित केलेली आणि अल्पावधीत, परदेशात ‘वॉल मार्ट’ तर भारतात डी-मार्ट अशी  ख्याती या कंपनीने मिळवली.किराणा माल,दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या नित्यपयोगी वस्तूंचा पुरवठा, ज्याचे महत्त्व आताच्या टाळेबंदीच्या / संचारबंदीच्या दिवसात प्रकर्षांने जाणवते. या दिवसातही डी-मार्टने ग्राहकोपयोगी कल्पना राबवली. सहकारी गृहनिर्माण संस्था / संकुलांमधून किराणा मालाची घाऊक नोंदणी केल्यास, त्या वस्तू गृहनिर्माण संस्थेपर्यंत पोहोचविल्या जातील. या संकल्पनेमुळे डी—मार्टच्या समभागाने अवघ्या तीन दिवसात १५ टक्क्य़ांचा परतावा दिला.   (क्रमश:)

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.