येत्या आर्थिक वर्षांतदेखील कंपनी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे हा शेअर तुम्हाला दोन वर्षांत चांगला फायदा मिळवून देईल.. एव्हेरेडी म्हटले की, डोळ्यासमोर लगेच येते ती बॅटरी. १९३४ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सुरुवातीला युनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीची उपकंपनी होती. त्यानंतर विल्यमसन मागोर समूहाने ही कंपनी ताब्यात घेतली. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर साधारण ११ वर्षांनी कंपनीचे नाव बदलून एव्हेरेडी ठेवण्यात आले. कंपनीच्या प्रमुख उत्पादनांत कार्बन झिंक बॅटरिज, अल्कलीन बॅटरिज, ड्राय सेल बॅटरिज, रिचार्जेबल बॅटरिज, फ्लश-लाइट, पॅकेट टी इ. उत्पादनांचा समावेश होतो. शतकाहून अधिक वर्ष सेवा पुरवणाऱ्या एव्हेरेडी कंपनीचा कार्बन झिंक बॅटरिजच्या उत्पादनात जगात तिसरा क्रमांक लागतो. एव्हेरेडी हा भारतातील सर्वात मोठा बॅ्रण्ड असून भारतातील बॅटरिज बाजारपेठेत तिचा ५० टक्के हिस्सा आहे. तर फ्लश लाईट बाजारपेठेत ७५ टक्के हिस्सा आहे. भारतभरात सुमारे ४००० वितरक असलेल्या या कंपनीची इतरही अनेक उत्पादने असून आता ती गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेतही उतरली आहे. यात प्रामुख्याने एव्हेरेडी ब्रॅण्डखाली मिक्सर, पंखे, एअर प्युरिफायर्स, फूड प्रोसेसर, जूसर, टोस्टर, सँडविच मेकर, रोटी मेकर, कॉफी मेकर इ. विविध वस्तूंचा समवेश आहे. या करिता कंपनीने १०० सेवा केंद्रे उघडली असून आगामी वर्षांत ५० शहरात वितरक नेमण्याची योजना आहे. डिसेंबर २०१६ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ३२९.३१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३५.१९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ६५ टक्क्यांनी अधिक आहे. येत्या आर्थिक वर्षांतदेखील कंपनी चांगली कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. सध्या २५० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर तुम्हाला दोन वर्षांत चांगला फायदा मिळवून देईल. कंपनीने नुकतेच 'एव्हेरेडी अप्लायन्सेस' या ब्रँड नावाने एअर प्युरिफायर्सची श्रेणी बाजारात दाखल केली आहे. या उत्पादन श्रेणीत दोन मॉडेल्सचा समावेश असून त्यात एक अंतर्गत ह्य़ुमिडिफायरही आहे. वाजवी दरात हे उत्पादन उपलब्ध करून भारतात मूळ धरत असलेल्या हवा शुद्धी उपकरणांच्या बाजारपेठेचा १० टक्के हिस्सा मिळविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.