बाजारात जशी अशाश्वतता असते तशी राजकारणातदेखील असते. म्हणून संधी व संभाव्य धोके निरंतर असतीलच. फक्त नजीकच्या दोन-पाच वर्षांचा विचार न करता दूरगामी विचार केल्यास भारतीय भांडवली बाजारातील गुंतवणूक नक्कीच चांगला परतावा देईल..
माझी आजपर्यंतची सर्व गुंतवणूक शेअर बाजाराशी निगडित म्युच्युअल फंडात आहे. मागील दहा वर्षे बाजाराशी संबंधित गुंतवणुकीच्या गोमटय़ा फळांचा आस्वाद घेतल्यानंतर आता थेट बाजारात गुंतवणूक करावी असे वाटते. निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावर असताना माझा हा विचार योग्य आहे किंवा कसे, या बाबतीत तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
– डॉ. अस्मिता जोशी, पुणे
तुमची बचत तुम्ही समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडात गुंतवत आहात, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे अभिनंदन. समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाची रसाळ गोमटी फळे चाखल्यामुळे तुम्हाला बाजारात थेट उतरावेसे वाटणे साहजिक आहे. परंतु बाजार हा अनिश्चिततेने भरला असल्याने अनेकांना धोकादायक वाटतो. नजीकच्या वर्षांतील ब्रेग्झिट, अमेरिकेत ट्रम्प यांचा विजय, भारतात झालेले निश्चलनीकरण या काही अकल्पित घटनांनी बाजार तात्पुरता घसरला तरी आज निर्देशांकांची दौड अथक राहिली आहे. आज बाजार निर्देशांक सर्वोच्च पातळीवर असल्याने तुम्हाला बाजारात थेट गुंतवणूक करण्याविषयी साशंकता वाटणे साहजिक आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालांनंतर, फारुखअब्दुल्ला यांनी केलेले एक विधान लक्षात घेणे आवश्यक वाटते. अब्दुल्ला जसे म्हणाले की, ‘२०१९ विसरा, आता २०२४ ची तयारी करा.’ याचा अर्थ मोदी सरकार २०२४ पर्यंत तरी सत्तेवर राहील. परंतु बाजारात जशी अशाश्वतता असते तशी राजकारणातदेखील असते. आज मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. ही लोकप्रियता नेमकी कधीपर्यंत टिकेल हे सांगता येत नाही. मोदी सरकार करीत असलेल्या ‘जीएसटी’सारख्या आर्थिक सुधारणांनी अर्थव्यवस्थेला नेमका किती फायदा होईल हे समजण्यास काही काळ जावा लागेल. भारत हा तरुणांचा देश असल्याने भारताची अर्थव्यवस्था स्वयंसिद्ध आहे. भारताची लोकसंख्या युरोप खंड, अमेरिका खंड व ऑस्ट्रेलिया खंडातील लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. सरासरी लोकसंख्येचे वयोमान ३२ वर्षे असल्याने १२५ कोटी जनतेच्या मागण्यासुद्धा तितक्याच मोठय़ा आहेत. तेव्हा नजीकच्या दोन-पाच वर्षांचा विचार न करता दूरगामी विचार केल्यास भारतीय भांडवली बाजारातील गुंतवणूक नक्कीच चांगला परतावा देईल.
बाजारात जरी अनिश्चितता भरलेली असली तरी संभाव्य धोक्यांचा अंदाज घेऊन गुंतवणुकीतील धोका नक्कीच कमी करता येतो. माझ्या मते आगामी काळात फ्रान्स व जर्मनी या दोन्ही देशांत होणाऱ्या निवडणुका या बाजारासाठी धोकादायक आहेत. येत्या २४ एप्रिल रोजी फ्रान्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक असून सप्टेंबर महिन्यात जर्मनीच्या चॅन्सलरपदासाठी निवडणूक होणार आहे. ब्रिटन व अमेरिकेपाठोपाठ जर्मनी व फ्रान्स या दोन्ही देशांत निवडणुकांपश्चात सत्तापरिवर्तन संभवते. युरोपीय महासंघाचा सर्वात जास्त फायदा ‘पिंग्ज’ देशांना झाला तसा तोटा फ्रान्स व जर्मनी या सुदृढ अर्थव्यवस्थांना झाला. नको असलेले ओझे या देशांनी किती व का वाहायचे असा प्रश्न या देशातील नागरिकांना पडला आहे. ही खदखद निवडणुकींच्या निकालात प्रगट होण्याची शक्यता वाटते. असे झाले तर बाजारासाठी हा नक्कीच धोका असेल.
म्युच्युअल फंड गुंतवणुकीमार्फत तज्ज्ञ निधी व्यवस्थापक गुंतवणुकीत वैविध्य आणून गुंतवणुकीतील धोका कमी करीत असतो, तर जेव्हा तुम्ही बाजारात थेट गुंतवणूक करता तेव्हा बाजारातील चढउतारांचा तुमच्या गुंतवणुकीवर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपेक्षा अधिक परिणाम होत असतो. बाजारातील नवीन गुंतवणुकांत असलेली संधी व संभाव्य धोके यांची नोंद घेतल्यानंतर माझ्या मते तुम्ही बाजारात दीर्घ मुदतीची (किमान पाच वर्षे मुदतीची) गुंतवणूक करायला हरकत नाही. ही गुंतवणूक करतांना गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या ताज्या अंकात एक आदर्श पोर्टफोलिओ दिला आहे. या पोर्टफोलिओचा तुम्ही वस्तुपाठ म्हणून उपयोग करायला हरकत नाही. तुम्हाला गुंतवायची रक्कम एकाच दिवशी न गुंतवता, ही गुंतवणूक सारासार विचार करून सहा ते दहा महिन्यांत पूर्णपणे गुंतवावी. दीर्घ मुदतीचा विचार केल्यास २०२२ पर्यंत गुंतवणुकीत अपेक्षित भांडवली वृद्धी झालेली दिसेल याबद्दल खात्री बाळगा.
arthmanas@expressindia.com
(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)