|| वसुंधरा काशीकर

उर्दू गझलकार-कवी शहरयार यांच्या साक्षेपी चरित्राचा हा परिचय..

‘शहरयार’ हे नाव उच्चारताच अपरिहार्यपणे दोन समानार्थी शब्द आपल्या मनात उमटतात एक म्हणजे ‘उमराव जान’ आणि दुसरं ‘ज्ञानपीठ’! शहरयार हे नाव खऱ्या अर्थानं ‘उमराव जान’ या सिनेमामुळं भारतात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलं; परंतु शहरयार यांची ही ओळख फार अपुरी आणि छोटी आहे. त्यापलीकडचे किती तरी खोल शहरयार रक्षंदा जलिल यांनी ‘शहरयार : अ लाइफ इन पोएट्री’ या चरित्रातून दाखवण्याचा, शोधण्याचा आणि पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

आपल्या मनोगतातच लेखिकेनं शहरयार हे ‘तरक्कीपसंद’ (पुरोगामी) कवी होते की ‘जदीद’ (आधुनिक), या महत्त्वाच्या मुद्दय़ाचा हलकासा ऊहापोह केला आहे. रोजच्या भाषेत किंवा मानव्यशाखांमध्ये ‘पुरोगामी’ आणि ‘आधुनिक’ हे शब्द समानच मानले जातात; परंतु साहित्यामध्ये हे दोन शब्द दोन स्वतंत्र चळवळी आणि विचारप्रवाह दर्शवतात. ‘तरक्कीपसंद’ लेखकांच्या चळवळीवर डाव्या, मार्क्‍सवादी विचारधारेचा प्रभाव दिसून येतो. कैफी आजम्मी, अली सरदार जाफरी, साहीर लुधियानवी आदी शायरांची तरक्कीपसंद म्हणून उदाहरणं देता येतील. ‘जदीद’ साहित्य हे विशेषत: जागतिक स्तरावर दुसऱ्या महायुद्धानंतर वाढलं. युद्ध, संहार, क्रौर्य हे मानवी जीवनातील रखरखीत वास्तव साहित्यात दिसू लागले. जीवन आणि माणूस आहे तसं आम्ही दाखवतो, असं आधुनिकतावादी लेखकांचं म्हणणं.

शहरयार ज्या काळात लिहू लागले, त्या काळात या दोन्ही साहित्य चळवळी जोरात होत्या. स्वातंत्र्य मिळून दहा-बारा वर्ष उलटली होती. पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली समाजवाद आणि मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली होती. रशिया हा आपला मित्र आणि मार्गदर्शक होता. फाळणीच्या जखमा ताज्या होत्या.

शहरयार यांचे अनेक टीकाकार – ‘शहरयार यांना कोणालाही दुखवायचं नव्हतं, म्हणून ते कोणत्याही चळवळीत सामील झाले नाहीत’ अशी टीका करतात; पण लेखिकेच्या मते, ही संदिग्धता ही शहरयार यांची कमजोरी नसून त्यांच्या स्वतंत्र आत्म्याचं ते प्रतीक आहे. शहरयार कोणत्याही एका खुंटीला बांधून घेणं नाकारतात आणि केवळ कवितेशी इमान राखतात.

रक्षंदा यांनी चरित्राची विभागणी दोन भागांत केली आहे. पहिल्या भागात त्यांचा जन्म, महाविद्यालयीन जीवन, त्यांच्या लिखाणाची सुरुवात, प्राध्यापकी पेशा, त्यांच्या गझला-नज्म, लिखाणामागच्या प्रेरणा, प्रभाव अशा सर्व गोष्टींवर लेखिकेनं प्रकाश टाकला आहे, तर दुसऱ्या भागात त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला आहे.

शहरयार यांचं मूळ नाव- ‘कुँवर अखम्लाकम् खान’! त्यांनी ‘शहरयार’ हे नाव अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील त्यांचा मित्र आणि मार्गदर्शक खम्लीलूर रहमान आजम्मी यांच्या सूचनेवरून स्वीकारलं आणि पुढे हे ‘तखम्ल्लुस’च (टोपणनाव) ‘नाव’ झालं!

अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचं फारच मोठं योगदान शहरयार यांच्या आयुष्यात आहे. कला, मानव्यशाखा, विज्ञान या विषयांतील अभ्यासू, विद्वान प्राध्यापक आणि उसळत्या रक्ताचे, बुद्धिमान, प्रतिभावान तरुण असं चैतन्यमय वातावरण विद्यापीठात होतं. या विद्यापीठातच शहरयार यांनी उर्दूमधून एमए केलं. इथेच त्यांची ‘कम्लम’ बहरली. इथेच ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इथेच ते कुँवर अखम्लाकम् खानचे ‘शहरयार’ झाले! वयाच्या २३ व्या वर्षीच त्यांची कविता भारतातल्या साहित्यविश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नियतकालिकांमध्ये छापून येऊ  लागली.

राही मासूम रजम हे दूरदर्शन आणि सिनेजगतातलं मोठं नाव. रजम हे शहरयार यांचे समकालीन. हे दोघेही एकमेकांचे जबरदस्त स्पर्धक. अलीगढ मुस्लीम विद्यापीठात प्राध्यापकाच्या नोकरीसाठी दोघांनीही अर्ज केले होते, पण निवड शहरयार यांची झाली. यावर रजमंनी विद्यापीठाने पक्षपात केला आहे म्हणून विद्यापीठाला कोर्टात खेचलं, हा एक फारसा माहीत नसलेला किस्सा वाचायला मिळतो. शहरयार यांच्या अनेक विद्यार्थ्यांशी, सहाध्यायांशी लेखिका बोलली आहे. त्यातून शहरयार हे अत्यंत विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असल्याचं कळतं. आपल्या कित्येक विद्यार्थ्यांशी शहरयार यांनी आयुष्यभराचे संबंध जोपासले.

शहरयार वर्गात बसून शिकवत. एक लघुकथा शिकवायला शहरयार दिवसचे दिवस घेत असत. कथेतलं वाक्य अन् वाक्य मुलांनी वाचलंच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे. राजेन्द्र सिंह बेदीची ‘अपना दुख मुझे दो’ ही कथा शिकवायला त्यांनी १५ दिवस घेतल्याची आठवण त्यांचा एक विद्यार्थी सईद मोहम्मद अश्रफ सांगतो.

शहरयार हे अत्यंत उदार आणि प्रेमळ प्राध्यापक होते. एखादा विद्यार्थी त्यांना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेला, तर ते त्याला चहा आणि सिगरेट ऑफर करत! १९६० च्या दशकातील मूल्यांचा विचार करता हे फारच विलक्षण वाटतं, किंबहुना आजही ते विलक्षणच ठरेल.

एक महत्त्वाची नोंद लेखिका पुस्तकात करतात ती ही की- अलीगढ मुस्लीम विद्यापीठ म्हणजे कडव्या धार्मिक मुस्लीम विचारांचं केंद्र होतं, ही लोकांमध्ये असलेली धारणा चुकीची आहे. उर्दू, अरेबिक, पर्शियन आणि इस्लामचा अभ्यास या विभागांसोबतच तिथे गणित आणि इतर शास्त्रंही शिकवली जायची. त्या काळातच तिथे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विषयांचे अभ्यासक्रमही सुरू झाले. बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक मुस्लीम असले, तरी वातावरण मात्र मुस्लीम वा कट्टर धार्मिक नव्हतं.

जे अलीगढ मुस्लीम विद्यापीठाबाबत लागू आहे, तेच शहरयार यांच्याबाबतही लागू आहे. शहरयार यांनी संपूर्ण हयातभर केवळ उर्दूतून लेखन केले; पण उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा आहे हा अत्यंत चुकीचा समज जर कोणी आपल्या लिखाणातून खोडून काढला असेल, तर तो शहरयार यांनीच. उर्दू ही भारताची भाषा आहे हे ठसठशीतपणे आपल्या कवितेतून त्यांनी अधोरेखित केले आहे.

कवी, शायर याव्यतिरिक्त शहरयार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतर रोचक पैलूही रक्षंदा मांडतात. शहरयार हे खवय्ये होते हे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण ते उत्तम स्वयंपाक करत हे फार थोडय़ा जणांना माहीत असेल. ते एक कुटुंबवत्सल गृहस्थ होते. आपल्या तीन मुलांवर त्यांचे विलक्षण प्रेम. त्यांना सकाळी उठवणे, शाळेसाठी तयार करणे, घरची कामं करणे हे सगळं ते आवडीनं करत असत. हे वाचत असताना शहरयार यांचा घटस्फोट का झाला असेल, असा प्रश्न आपल्याला पडतो; परंतु त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या चरित्रातून मिळत नाही. लेखिकेनं जाणीवपूर्वक या विषयावर लिहायचं टाळलं आहे असं वाटतं. त्यांच्या घटस्फोटाचा फक्त उल्लेख आहे.

शहरयार यांनी आपला तिसरा कवितासंग्रह- ‘हिज्र के मौसम’ हा आपल्या पत्नी नजमा मेहमूद यांना अर्पण केला आहे. घटस्फोटातून आलेल्या एकटेपणाचं दु:ख त्यांच्या कवितेत दिसून येतं. तसंच गैरसमजातून तुटलेल्या मैत्रीची वेदनाही त्यांच्या कवितेत उतरते. ते लिहितात-

‘तुम मेरे कितने पास हो,

मैं तुमसे कितना दूर हूँ..’

शहरयार हे शांत, संयत, उमद्या आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. ते व्यक्तिमत्त्व त्यांच्या कवितेतही उतरलेलं दिसतं. शहरयार यांच्या कवितेत कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. फैजम् किंवा साहीर यांची आक्रमकता नाही. सत्ताधाऱ्यांना ते प्रश्न विचारतात, पण संयत कठोरपणे..

‘तुम्हारे शहर में कुछ हुआ नहीं क्या?

कि तुमने चीखोंकों सचमुच सुना नहीं क्या?

मैं इक जम्माने से हैरान हूँ की हाकिम-ए-शहर (शहराचा मुख्य नेता)

जो हो रहा है उसे देखा नहीं क्या?’

शहरयार हे स्वत:ला मार्क्‍सवादी मानत, पण तरीही ते पूर्णपणे नास्तिक नव्हते. स्वत:पेक्षा मोठी, शक्तिशाली आणि गूढ अशी ताकद आहे असे ते मानत; परंतु ते धार्मिकही नव्हते. त्यांचे विद्यार्थी एस. एम. अश्रफ सांगतात की, ‘‘शहरयार यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीही जवळच्या लोकांची अंत्ययात्रा चुकवली नाही; पण नमाजम्-ए-जनाजमला (मृताला दफन करण्याच्या आधी म्हणली जाणारी प्रार्थना) मात्र ते दूर जाऊन उभे राहत व तो संपण्याची वाट बघत. आपल्या कोणत्याही कृतीनं वा शब्दानं लोकांच्या धार्मिक संवेदनांचा अपमान होणार नाही याची ते काळजी घेत.’’

शहरयार हे आशावादी शायर होते. रक्षंदा यांनी २०१० च्या नोव्हेंबरमध्ये ‘द हिंदू’ या वृत्तपत्रासाठी त्यांची मुलाखत घेतली होती. तुम्हाला हे जग दु:खमय वाटतं का? किंवा चांगुलपणावर वाईटपणा आणि प्रकाशावर अंधार हावी होतो आहे, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न लेखिकेनं त्यांना विचारला होता. शहरयार यांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘मी आशावादी माणूस आहे. जेव्हा मी माझ्या अवतीभवती बघतो तेव्हा आनंदी आणि सकारात्मक राहण्यासाठी मला अनेक कारणं सापडतात.’

साहित्याची सामाजिक-राजकीय बांधिलकी असली पाहिजे यावर त्यांचा विश्वास आहे. फैजम् हे इकम्बालपेक्षा मोठे शायर आहेत, असं शहरयार म्हणतात. त्यांच्या मते, फैजम् हे जास्त मानवीय आहेत; त्यांना एका विशिष्ट समुदायात रस नाही, तर संपूर्ण मानवजातीबद्दल आस्था आहे. शहरयारांची साहित्यिक म्हणून भूमिका स्पष्ट होते.

गझल आणि नज्ममधील रचनेच्या व मांडणीच्या फरकाची लेखिकेनं चर्चा केली आहे. शहरयार यांची गझल ही अनेकदा नज्मसारखी वाटते. ती सलग एकाच विषयावर बोलते, तर याउलट त्यांची नज्म ही अधिक थेट आणि व्यक्तिगत आहे, असं निरीक्षण लेखिका नोंदवते. स्त्री-पुरुष संबंधांबद्दल शहरयार व्यक्त होताना बटबटीत होत नाहीत.

मुजफ्फर अलींच्या ‘गमन’, ‘उमराव जान’ या चित्रपटांसाठी शहरयार यांनी गझला लिहिल्या; परंतु मुंबईची झगमगती चित्रपटसृष्टी या सौम्य प्रकृतीच्या शायरला मानवली नाही. मुजफ्फर अलींनंतर त्यांचे इतर कुठल्याही दिग्दर्शकाशी बंध जुळू शकले नाहीत. मान्यता आणि प्रसिद्धीची भूक शहरयार यांना कधी नव्हतीच.

शहरयार यातून जसे समजतात, तसेच तो काळ, साहित्यिक चळवळी, गझलचे व्याकरण हे विषयही पुस्तकात आहेत. संशोधन कसे करावे, संदर्भ ग्रंथांची यादी, तळटिपा कशा द्याव्यात यासाठी हे पुस्तक वाचावे असे आहे.

  • ‘शहरयार: अ लाइफ इन पोएट्री’
  • लेखिका : रक्षंदा जलिल
  • प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया
  • पृष्ठे : २२६, किंमत : ५९९ रुपये

vasu.rubaai@gmail.com