अद्याप तूर खरेदीचे आदेश नाहीत, शेतकरी वैतागला जिल्ह्यत शासनाच्या तूर खरेदी धोरणाच्या धरसोडीमुळे शेतकरी वर्ग पुरता वैतागला आहे. २२ एप्रिल ही तूर खरेदीची अखेरची तारीख होती. पुन्हा मुख्यमंत्र्यांनी ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्याची घोषणा केली. मात्र, िहगोली बाजार समितीला अद्याप शासनाकडून तूर खरेदीचे आदेश मिळाले नाहीत, असे सांगण्यात येत असल्यामुळे शेतकरी हतबल झाला असून, मुख्यमंत्र्यांची घोषणा ही वाऱ्यावरच वरात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील तूर खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत १७ कोटी किमतीची ३४ हजार क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी झाली. २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी करणार असल्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. दरम्यान, संत नामदेव मार्केट यार्डात १२ हजार क्विंटलच्या वर शेतकऱ्याची तूर पडून होती. केवळ ६ हजार क्विंटलच्या नोंदी झाल्या होत्या. केंद्रीय कृषी मंत्रालयाने महाराष्ट्रात ३१ मे २०१७ पर्यंत वाढीव तूर खरेदी करण्याचे मान्य केले. परंतु राज्य शासनाच्या २७ एप्रिलच्या अधिसूचनेनुसार आधीच झालेल्या खरेदीपोटी भरपाई होणार नाही. तसेच प्राईस सपोर्ट स्कीम खालील खरेदीशीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. खरेदीनंतर माल साठवण्यासाठी गोदामे आणि जागेची व अन्य साधनसंपत्तीची आवश्यक व्यवस्था करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनावर टाकण्यात आली. कृषी मंत्रालयाने एक प्रकारे सशर्त तूर खरेदी करण्याचीही तयारी दर्शवली असून, त्यातील आíथक जबाबदारीसुद्धा राज्यावरच टाकली आहे. ५ मे रोजी महाराष्ट्र शासनाकडून आणखी एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यामध्ये ३१ मे पर्यंत तूर खरेदी करण्यात येणार होती. या एकूण परिस्थितीवरूनच मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत तूर खरेदी करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनीच तूर खरेदीला मुदतवाढ दिल्याने मार्केट यार्डात पुन्हा शेतकरी मोठय़ा प्रमाणात आपली तूर विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे चित्र आहे. हिंगोलीतील संत नामदेव मार्केट यार्डात २२ एप्रिलपर्यंत १२ हजार क्विंटल तूर पडून होती. त्यातील नोंद झालेली ६ हजार क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी झाली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे परत शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात तूर विक्रीसाठी घेऊन येण्याची गर्दी केली. आजमितीला १२ हजार क्विंटलच्या वर शेतकऱ्यांची तूर पडून आहे. नोंदणी कक्षात आत्तापर्यंत ३ हजार ५००च्या वर शेतकऱ्यांनी आपली तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. सुरुवातीला अधिकृत नोंद झाल्याबाबत व त्यानंतर तूर विक्रीसाठी घेऊन येण्याची तारीख एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे. अनेक शेतकरी तूर नोंदणी कक्षात गर्दी करीत असल्याचे चित्र असले तरी अद्याप शासनाकडून तूर खरेदीसंदर्भात अधिकृत आदेश आले नाहीत. त्यातच विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने िहगोलीतून काढता पाय घेतला असून, आता तूर खरेदीचे सूत्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बाजार समितीने स्थापन केलेल्या तूर नोंदणी कक्षात आत्तापर्यंत ३५०० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, २५ हजार क्विंटलच्या वर तूर मार्केट यार्डात विक्रीसाठी येईल, असा अंदाज बाजार समितीचे सचिव डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केला. सोमवारी ३५०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटल तुरीला भाव होता. मोंढय़ात दीड हजार क्विंटलच्या वर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी टाकली होती. नाफेड तूर खरेदीच्या गोंधळाला कंटाळून ‘भिक नको, कुत्रे आवर’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने अनेकांनी पडल्या भावात आपली तूर विकून मोकळे होण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.