येथील शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना पाणीटंचाईमुळे खासगी दवाखान्यात जा, असा सल्ला दिला जात आहे. या रुग्णालयासाठी दररोज १४ हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, नगरपालिकेकडून केवळ ७ हजार लिटर पाणी टँकरद्वारे दिले जाते. परिणामी रुग्णालयात स्वच्छता राहत नसल्याने येणारा ताण कमी करण्यासाठी ऐपत असणाऱ्यांना खासगी रुग्णालयात पाठविले जात आहे.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका आरोग्य यंत्रणेलाही बसू लागला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच स्त्री रुग्णालयाचीही मदार टँकरच्या पाण्यावर आहे. एका प्रसूतीनंतर स्वच्छतेसाठी किमान ४० लिटर पाणी लागते. शहरातील स्त्री रुग्णालयाची क्षमता ६० खाटांची असली, तरी दररोज १२५ ते १३० रुग्ण तपासले जातात. २५ ते ३० गर्भवती महिलांची प्रसूती होते. पाच ते सहा गर्भवती मातांवर शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे रुग्णालयात पाण्याची अधिक आवश्यकता असते. स्त्री रुग्णालयातील दोन विंधनविहिरी आटल्या आहेत. नळजोडणी दिली गेली नव्हती. परिणामी टँकरच्या पाण्यावरच रुग्णालयाची भिस्त आहे. निम्मेच पाणी मिळत असल्यामुळे अस्वच्छता वाढते आहे. क्षमतेपेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्याने पाण्याची समस्या सोडवता येत नाही म्हणून स्त्री रुग्णालयातील काही गर्भवती मातांना शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पाठवता येऊ शकते काय, याची चाचपणी केली जात असल्याचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ माले यांनी सांगितले.
पाणी समस्येमुळे शल्यगृहातील कपडय़ांची, शस्त्रक्रिया साहित्याची तसेच शल्यगृहाची स्वच्छता राखता येत नाही. अनेक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना रुग्णालयात येताना घरूनच पाणी आणावे लागते. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private hospitals scarcity born children start
First published on: 07-04-2016 at 01:40 IST