पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आज औरंगाबादेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, शिंदे-फडणवीस सरकार आणि पोलीस प्रशासनावर निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले, “कोकण विभागातील एक पत्रकारास ज्याप्रकारे संपवण्याचा आणि जो अपघात दाखवला गेला. यामागे कोण आहे, कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. हे सरकार, पोलीस यंत्रणा काय करत आहे? सगळे झोपा काढता आहेत काय? वस्तूस्थिती कळली पाहिजे. लोकांनाही कळेना, जर महत्तवाच्या लोकांच्याबाबत अशा घटना घडायला लागल्या, तर सर्वसामान्य माणासांनी कुणाकडे बघावं? कायदा, सुव्यवस्था कशी या राज्यात राहणार? या सगळ्याच गोष्टीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. याचा तपास लागलाच पाहिजे.”
याशिवाय, “याबद्दल उद्या २७ तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत आणि हे सरकार आल्यापासून घडत आहेत, हे सरकारचं अपयश आहे.” असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या महिनाभरातील दोन मुंबई दौऱ्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवेसना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्याप्रकरणावरून पत्रही लिहिले आहे. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीतील सभेत केलेल्या एका विधानाचा उल्लेख करत, संजय राऊत यांनी शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून मोठं विधानही केलं आहे. यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे.