आपल्याला माहीतच आहे की, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण प्रथम गणपतीला वंदन करून त्याचे आशीर्वाद घेतो. ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. आज आपण प्राचीन थोर रचनाकारांनी त्यांच्या काव्यात गणेशस्तुती कशी केली आहे, हे पाहू या. अशा प्रकारच्या रचनांचे संकलन तुम्हाला खचीत उपयोगी पडेल.१) देवर्षी श्री नारद - संकष्टनाशन स्तोत्राची सुरुवात करताना लिहितात- प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये॥२) संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी या नावाने प्रसिद्ध) या ग्रंथाच्या सुरुवातीला गणेशाचे वंदन असे केले आहे- ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु । म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥३) संत तुकारामांनी त्यांच्या प्रसिद्ध अभंगात लिहिले आहे- ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥४) समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांची सुरुवात अशी केली आहे- गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ (सुखकर्ता दु:खहर्ता ही प्रसिद्ध आरतीही संत रामदासांनीच रचलेली आहे.)५) गिरिधर कवीने ही भूपाळी रचली आहे- उठा उठा हो सकल जन,वाचे स्मरावा गजानन । गौरीहराचा नंदन, गजवदन गणपती॥६) कवी रामानंदांनी ही भूपाळी लिहिली आहे- उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख । ऋद्धि-सिद्धिचा नायक, सुखदायक भक्तांसी ।७) गोसावीसुत वासुदेव अशी स्तुती करतात- नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे। माथा शेंदुर पाझरे वरी वरी दूर्वाकुराचे तुरे॥८) संत नामदेव यांनीसुद्धा श्रीगणेशाचे मंगलस्तवन केले आहे- लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करितसे खंड दुश्चिन्हाचा । चतुर्थ आयुधे शोभती हाती । भक्ताला रक्षति निरंतर ॥९) संत एकनाथांनी एकनाथी भागवताच्या आरंभी सोळा ओव्यांतून मंगलमूर्तीला अभिवादन केले आहे-नमन श्री एकदंता । एकपणे तूचि आता । एकी दाविसी अनेकता । परि एकात्मता न मोडे ।गणेश चित्र - गायत्री उतेकर