रावणाला बिभीषण व कुंभकर्ण असे दोन भाऊ होते. त्यातील कुंभकर्ण झोपाळू होता. तो म्हणे सलग आठ ते दहा महिने झोपत असे. तो जर का झोपलेला असेल तर काही कारणासाठी त्याला झोपेतून उठवणे हे एक जिकिरीचे काम असे. राम- रावण युद्धाच्या वेळीही तो झोपलेलाच होता. त्याची झोप सलग नऊ महिने झाली होती. युद्धकाळात रावणाच्या आज्ञेनुसार काही राक्षस त्याला उठवायला गेले तेव्हा तो झोपलेल्या अवस्थेत एखाद्या पर्वतासारखा दिसत होता. त्याने भुजंगाप्रमाणे सुस्कारा टाकून राक्षसांना उडवूनच दिले. तरीही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. प्रथम त्यांनी कुंभकर्णाच्या शरीराला चंदनाचा लेप लावला. धूप व उदबत्त्या लावून सर्वत्र सुगंध पसरवला. जोरजोरात मेघगर्जना केली. आरोळ्या ठोकल्या. दंड ठोकले. शंख, दुंदुभी रणवाद्य यांचा सिंहनाद केला. अनेकजणांनी मिळून कुंभकर्णाला हलविले. तरीही तो तसूभरही हलला नाही. म्हणून राक्षसांनी त्याच्या अंगावर व वक्षस्थळावर मुसळे, गदा, मुदगर, भुशुंडी, मुष्टी यांचे प्रहार केले. तरीही तो जागा झाला नाही. म्हणून दहा हजार राक्षसांनी गराडा घालून घोडे, उंट, गाढवे व हत्ती यांना वापरून त्याचे ताडन केले. पण तो काही जागा झाला नाही. मग त्यांनी एक हजार नौबती एकदम झडवल्या. अनेक राक्षस त्याच्या अंगावरून इतस्तत: फिरले. त्यांनी त्याचे केस उपटले, कान चावले, पाण्याच्या शेकडो घागरी त्याच्या कानात ओतल्या. पण व्यर्थ! शेवटी एक हजार हत्ती एकाच वेळी त्याच्या शरीरावरून धावत नेले. तेव्हा अंगाला कशाचा तरी स्पर्श होत आहे, असा भास त्याला झाला आणि तो झोपेतून जागा झाला. सर्वसामान्य माणसामध्ये एवढी राक्षसी झोप काही शक्य नाही. पण इतरांच्या तुलनेत गाढ झोपणाऱ्या व्यक्तीच्या झोपेला ‘कुंभकर्णासारखी झोप’ असे म्हटले जाते.