राजश्री राजवाडे काळे ‘‘चला चला चला, लवकर चला, भरभर चला, माझ्या पिल्लांनो, आता तुम्ही बाहेर येऊ शकता आणि मुक्तपणे खेळू शकता.’’ मिंगी कुत्री आपल्या छोटुल्या पिल्लांना सांगत होती. आईचं हे बोलणं ऐकून झाडाला टेकून असलेल्या फळीमागे दडवून ठेवलेली पिल्लं पटापट बाहेर पडू लागली.‘‘सुकली गं माझी बाळं. चार दिवस खेळणं नाही की मोकळ्या हवेत दुडुदुडु धावणं नाही.’’ मिंगी कुत्री बोलत होती. हा सारा प्रकार पाहून झाडावर बसलेलं कबुतर खाली आलं आणि मिंगी कुत्रीला विचारू लागलं, ‘‘काय गं, तू काय लपवून ठेवलं होतंस की काय पिल्लांना आणि कशासाठी ते?’’‘‘अरे, या माणसांचा होळी आणि रंगपंचमीचा सण होता ना म्हणून माझ्या गोंडस पिल्लांवर रंगाचं पाणी उडवून खराब करून टाकलं असतं या माणसांनी. त्यांच्या कपाळावर लावले असते टिळे. सण माणसांचा आणि शिक्षा मात्र आपल्याला मिळे.’’ मिंगी अगदी वाईट वाटून बोलत होती. ‘‘अरे, मागच्या वर्षी दिवाळीत आठवतंय ना काय झालं? माझा भाऊ..’’ मिंगीला पुढे बोलवेना. कबुतरालाही माहीत होतं की मिंगीचा भाऊ मिकीच्या शेपटीला दिवाळीत कोणी तरी फटाके बांधले आणि पेटवले, तो त्यातच जखमी होऊन गेला. तिचं सांत्वन करत कबुतर म्हणालं, ‘‘होय, होय अगदी अशीच वेळ आम्हा पक्ष्यांवर काही दिवसांपूर्वी आली होती. पक्षी संघटनेनं तातडीची मीटिंग घेतली आणि ठरवलं की, दुकानांमध्ये पतंग विकायला आले आहेत, आता आकाशातही उडवले जातील, म्हणून सर्वानी चांगला चार दिवसांचा अन्नसाठा करून ठेवायचा आणि आकाशी झेप घेण्याचा मोह आवरायचा. संक्रांतीचा सण आला होता ना माणसांचा.’’ कबुतर आणि मिंगी कुत्रीचं बोलणं ऐकून वडाचं झाड हलू लागलं आणि न राहवून ते म्हणालं, ‘‘वटपौर्णिमेचा सण आला की माझेही अस्सेच हाल होतात, माझ्या फांद्या तोडतात ही माणसं.’’ ते ऐकून कबुतर म्हणालं, ‘‘अरे, तसेच दसऱ्याच्या दिवशी आपटय़ाच्या झाडाचे हाल होतात.’’ इतक्यात आवाज आला, ‘‘दसऱ्याच्या दिवशी माझेही हाल होतात.’’ सगळय़ांनी वळून पाहिलं तर कांचनाचं झाड बोलत होतं, ‘‘माझी पानं अगदी सेम टू सेम आपटय़ाच्या पानासारखी दिसतात, म्हणून माझी पानं तोडतात ही माणसं. माणसांचे सण आणि आपले मात्र हाल.’’ हे सगळं ऐकून नागोबानं हळूच बिळातून मान वर काढली आणि म्हणाला, ‘‘माफ करा मधेच बोलतो, पण नागपंचमीच्या दिवशी माझेही हाल होतात खूप. परमेश्वरानं हे सण आपल्याला शिक्षा मिळावी यासाठी निर्माण केलेत का?’’नागाचं हे बोलणं ऐकून चिमणी टुणकन् उडी मारून खाली उतरली आणि म्हणाली, ‘‘नागोबा, तू विसरलास, आता नागपंचमीच्या दिवशी तुला त्रास द्यायची कोणाची हिंमत नाही, कारण तसा नियमच केलाय माणसांनी. हे बघा, परमेश्वराला बोलण्यात काही अर्थ नाही. कारण माणसं सण साजरे करताना पक्ष्यांना, प्राण्यांना, निसर्गाला होणारा त्रास पाहून त्यालाही दु:ख होत असेल; आणि म्हणूनच त्यानंच पृथ्वीवर काही दूतच पाठवले आहेत जणू- जे सणवार साजरे करताना सृष्टीचं, प्राण्यांचं रक्षण व्हावं म्हणून जीव तोडून प्रयत्न करत असतात.’’ चिमणीचं हे बोलणं ऐकून सगळे गोंधळले.‘‘दूत? म्हणजे काय?’’‘‘कोणाला पाठवलंय देवानं आपल्या संरक्षणाकरिता?’’‘‘आता हे काय नवीन?’’.. अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ‘‘सांगते सांगते, अरे बाबांनो, या माणसांमधलीच काही माणसं जणू ‘देवाचे दूत’ आहेत, इंग्रजीत त्यांना ‘ animal activists’ असं म्हणा हवं तर. ते सगळे सतत प्रयत्न करत असतात, आपल्यासारख्या प्राण्या-पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून.’’ चिऊताईनं सगळय़ांना त्या दयाळू माणसांच्या कामाबद्दल सांगितलं. तशी मिंगी म्हणाली, ‘‘काही गरज नाही इंग्रजी झाडायची, मी तर बाई त्यांना ‘देवाचे दूत’च म्हणेन.‘‘खरं आहे. आपल्या सुरक्षेसाठी झटणारे हे देवाचे दूतच आहेत जणू,’’ असं म्हणत फुत्कारत नागोबा बिळात निघून गेला.‘‘इतकुशी चिमुरडी तू, पण तुझ्या हुशारीला, मान गये उस्ताद.’’ वडाचं झाड डोलत म्हणालं.हे सगळं बोलणं ऐकणारं एक झुरळ तुरुतुरु चालत पुढे येऊन म्हणालं, ‘‘पण दिवाळी आली की पेस्ट कंट्रोल करून आम्हाला मारतात, त्याविरुद्ध आवाज उठवणारं मी तर कुणी पाहिलं नाही माणसांमध्ये.’’ झुरळाचं हे बोलणं ऐकून आता सगळय़ांना हसावं की रडावं हेच कळेना.पण बालदोस्तांनो, तुम्हाला आवडेल का या निसर्गासाठी, प्राण्या-पक्ष्यांसाठी देवाचा दूत बनून राहायला?