- करणकुमार जयवंत पोले आजमितीस दोन महिने लोटले आहेत. घरातले अन्नपदार्थ वैगरे संपून बराच काळ झाला असेल. दररोज सकाळी कामाला जायचं आणि आलेल्या पैश्यातून आज रांधायला लागणाऱ्या वस्तू आणायच्या. कसंबसं पोट भरत दिवस ढकलायचे. ही सवय असे. अनेक रात्री तर कामामुळ स्वयंपाक करण्याचही त्राण नसे. मग नुसतं भात खाऊन अर्धपोटी झोपण्याचा प्रयत्न करावा तर अर्धवट झोपेमुळं सकाळी भोवळ आल्यासारखी वाटे. पण घरची आठवण आली की त्याचं काहीही वाटतं नसे. इतकी भयाण परिस्थिती घरची! त्यामुळंच तर गावापासून हजारो मैल दूर असलेल्या इथे येवून फक्त भाकरीसाठी दिवसभर काम करतं असतो. कामाच्या जागेपासून जवळच म्हणजे २०की.मी. अंतरावर एक वस्ती आहे. तिथे आमच्या गावचे सर्वजन आम्ही एकाच अर्धखोलीत राहतो. तसं रात्री आम्ही सर्वजन झोपल्यानंतर तसूभरही जागा उरतं नाही आमच्या ह्या खोलीत. त्यात पाऊस, हिव आणि आताचा उन्हाळा झेलत आम्ही दिवस रेटतो. दिवसभराच्या कामामुळ मुटकन झोपतो. भूकेने पेटलेली माणसं आहोत आम्ही. कुठंलही अवघड काम आनंदानं करत असतो. ह्या राज्यातले लोकं आमच्याकडे संशयीत आणि कुत्सित नजरेनं पाहत असतात. त्यांचा रोजगार आम्ही हिरावून घेतोय असं काहीशा नजरेनं! कुणाची किडनी हिसकावून घ्यावी असं त्यांच पाहणं आम्ही दुर्लक्षित करतो. बऱ्याच लोकल गुंडगिरीला बळी पडतात आमच्यापैकी काहीजन. पण पोटातल्या आगीपुढे मरणाची भिती वाटतं नसते. त्यामुळं आम्ही अश्या नजरा झेलत कुणाचे फटके खात थोडं उर्मटही होतो. कारण इथं टिकून राहणं आम्हाला महत्त्वाच असत. उत्तरप्रदेशचा पूर्वेकडील भाग असेल, बिहार मध्यप्रदेशचा काही भाग असेल असेल, इ. हे भारताच राजकीय भविष्य ठरवणारे भाग आहेत.सत्तापालटाची जणू केंद्रच आहेत. कारण निवडूक नावाची रेल्वे ह्यांच भागातून प्रवेशताना सुखावते. अगदी जात-धर्म आणि मंदिर-मज्जीतीच्या नावावर इथले रन कुणीही काबीज करू शकत. सर्वश्रेष्ठ गंगा ह्याच भागातून जाताना जशी नाल्याच रुप धारण करते तसं विकासाच्या गंगेच इथं डपक होतं. शिक्षण आरोग्य सोडाच पण खायला एक वेळच अन्नही मिळत नाही. त्यात घरात अशिक्षित वडिलांनी वाढवलेली कुटूंबाची लांबी आणि मुलगा वयात आला म्हणून बालिकेशी त्याचा लावलेला विवाह. त्या अश्या हजारो मुलींना पंधराव्या-सोळाव्या वर्षीच झालेली मुलं. अभाव असलेली आरोग्यकेंद्रे आणि भ्रष्टाचारनं बोकाळलेली ही योजनांची व्यवस्था मग आम्हाला घरं सोडण्यास भाग पाडते. आपल्या घराचा आसपास ओस पडलेला दिसला. दूरदूरपर्यंत कुठही काम मिळत नसेल तर आपलं अर्ध मन घरीच ठेवून देह झिजवण्यास मग स्थलांतरणास सुरवात होते. गावागावातले असे जथ्थेच्या जथ्थे मग मोठं-मोठ्या महानगरातल्या वस्तींत स्वतःला कायम सामावून घेतात. ह्या भयाण अश्या शहरांना आपलंस करण्याची इच्छा कुणाला असते? ह्यावर उत्तर भूक असू शकत! गेल्या दोन महिन्यांपासून ह्याच भुकेची तीव्रता जरा जास्तच जाणवत आहे. कोरोना नावाच्या भयावह आजाराने कराव्या लागलेल्या टाळेबंदीचे सर्वांत जास्त बळी कोण गेले? कोरोनाच्या भितीपेक्षाही आपण आपल्या गावाला पोचू की नाही ह्याची भितीच आम्हाला जास्त आहे. दोन दिवसही विनाकामाच्या हातान जगणं जमत नसताना दोन महिने असे काढणं खूप कठीण होतं. तो प्रत्येक दिवस आणि सरकारची प्रत्येक घोषणा काहीतरी सकारात्मक बातमी देऊन जाईल अशी आस लाऊन आम्ही बसायचो. पण प्रत्येक घोषणेबरोबर वाढत जाणारी ही टाळेबंदी आमच्या संयमाचा बांध रोखू शकतं नव्हती. मग इकडे भयानक अशी रुग्णांची वाढती संख्याही आमच्यावर परिणाम करणार नव्हती. कारण आमचा गाव दूर होता. आणि तो जवळ करण्यासाठी आम्हाला अंगात त्राण नसतानाही प्रवास करायचा होता. काहींनी दुधाच्या, सिमेंट कालवायच्या मशीनीतून, तर काहींनी साइकलदुचाकीने, काहींनी पायांनी तर काहींनी अनवाणी पायांनी हा प्रवास पुर्ण करायचं ठरवलं होत. काहींच्या सोबत म्हातारे होते. काहींच्या लहान मुलं तर काहीच्या सोबत अक्षरश: गर्भवती महिला. ह्या अश्या तळपत्या उन्हात. आणि जिथं कुणी भाकरी तर सोडाच पण पाण्याच एक थेंबही देऊ करणार नाही अश्या वाटेने! माणसाला माणूसकीचा विसर पडावा असा हा वाइरस कुठून आला असावा? मजल-दरमजल करतं प्रवास सुरू होता. गावागावाच्या वेशीवर अनेक लोक अस्पृश्यतेच्या जगण्याचा अनुभव घेत होते. दरवेळी जात हे कारण असत. यावेळी शहरं-गावातल अंतर हे कारण होत. स्थलांतरनाची ही उरं फोडणारी यात्रा याआधी फक्त फाळणीच्या काळातच झाली असेल. त्यानंतर आता. असाच प्रवास सुरू असताना. कुणाचतरी हे शेवटचं स्थलांतरण होतं. कुणी रेल्वे गाठण्यासाठी भयाण पळत सुटल होतं. आणि भयंकर धाप लागून अनेकांचा कपाळमोक्ष झाला . कुणी चालतं चालत रेल्वे रुळावर कायमच झोपल. कुणाचा कुठेतरी एखाद्या वाहणामुळं अपघात तर कुणी वाहणा-वाहणाच्या अपघातात मृत्यूमुखी. हे येवढे मृत्यू आणि कितीतरी पदद्याआड लपवून ठेवलेले! ह्यांना जबाबदार कोण? कौशल्यावर आधारीत शिक्षण देऊन लोकांना आत्मनिर्भर करू न शकलेलं सरकार? का आपल्याच प्रदेशात रोजगार निर्माण न करू शकलेले राजकारणी? कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लॉक डाउनचा पर्याय? का लॉक डाउन च्या अगोदर त्यांची व्येवस्था करू न शकलेले दृष्टीहीन नेते ? का मग स्थलांतरीत स्वतः? याला जबाबदार कोण आहे ह्यापैकी ह्यां परिस्थितीला बळी पडणारे फक्त गरिब बेरोजगार स्थलांतरितच आहेत आपल्या आयुष्याचा प्रवास नेहमी आपल्या पोटासाठी सुरू ठेवणारे! आणि बळी पडलेल्यांच हे तसं शेवटचं स्थलांतरण होतं आणि आयुष्याची भयंकर फरफट झालेल्यांनी आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतलाय पुन्हा कधीही स्थलांतरण न करण्याचा म्हणजे त्यांचही तसं हे शेवटचंच स्थलांतरण!