नव्वदीच्या दशकात म्युच्युअल फंड उद्योग जेव्हा भारतात जन्म घेत होता ते आजतागायत, ज्या व्यक्तींनी हा बहराचा काळ अनुभवला आणि ग्राहकांसाठी संपत्तीनिर्मिती केली त्यापैकी फंड विश्वातील एक अनुभवी सेनानी म्हणजे कैलाश कुलकर्णी. त्यांचा या क्षेत्रातील एवढा दांडगा अनुभव लक्षात घेऊन मी मुलाखतीची सुरुवात त्यांना पुढील पिढ्यांसाठी आपण एक पुस्तक लिहावे अशा विनंतीने केली. त्याला होकार देत असतानाच त्यांनी कारकीर्दीच्या सुरुवातीचे अनुभव सांगितले.

वर्ष १९९० मध्ये एमबीएचे शिक्षण संपवून आयशर मोटर्समधून कामाला सुरुवात केली. साधारण सहा वर्षं काम करून ते जे. एम. फायनान्शिअलमध्ये रुजू झाले. तेव्हा नुकताच शाखा विस्तार हाती घेतला होता आणि शाखा सांभाळण्याच्या अनुभवाचा त्यांना उपयोग करून घ्यायचा होता. साधारण १९९७ साली आशिया खंडातील काही विपरीत आर्थिक घडामोडींमुळे शाखा विस्तार बंद केला गेला आणि कैलास कुलकर्णी यांना मुंबईतील पीएम रोडवरील ‘शेअर आणि स्टॉक ब्रोकिंग’ विभागात प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आयपीओ, कंपनी एफडी, रोखे इत्यादी त्या काळातील सर्व आर्थिक साधनांच्या विक्रीचा अनुभव मिळत गेला. आयसीआयसीआय बँकेशी त्यादरम्यान संपर्क येत होता, त्यांना ‘थर्ड पार्टी डिस्ट्रिब्युशन’ सुरू करायचे होते. अर्थातच आयसीआयसीआय कॅपिटल सर्व्हिसेस (नंतर याचे आयसीआयसीआय बँकेत विलीनीकरण झाले) मध्ये त्या कामासाठी नियुक्त केले गेले. तिथेच त्यांनी म्युच्युअल फंडचा पर्याय ग्राहकांना देण्यास सुरुवात केली. वर्ष २००० ते २००३ पर्यंत आयसीआयसीआयमध्ये थांबून काही काळ विमा उद्योगात राहून वर्ष २००६ मध्ये कोटक म्युच्युअल फंडमध्ये विक्री विभाग प्रमुख या पदावर रुजू झाले.

narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

हेही वाचा – सेन्सेक्स १४०० अंकांनी वधारला, निफ्टीने २२,१२५ चा टप्पा ओलांडला

त्या काळातील म्युच्युअल फंड क्षेत्राविषयी बोलताना एक वेगळी आठवण त्यांनी सांगितली. एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा पहिला फंड जेव्हा बाजारात आलेला, तेव्हा अपेक्षेपेक्षा अधिक सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र जेव्हा त्याच्या एनएव्हीची सवलतीने सुरुवात झाली तेव्हा सर्वांचाच भ्रमनिरास झाला होता. म्युच्युअल फंड अजून लोकांना कळायचा होता. फंड कंपन्या मर्यादित होत्या. लोकांना एनएव्ही, एसआयपी हे शब्द माहिती नव्हते. कैलास कुलकर्णी यांनी कितीतरी लोकांच्या ‘पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट’ वरती शिकवण्या घेतल्या होत्या हे बोलताना जाणवले. भारतातील मोठ्या सात ते आठ शहरांमधूनच गुंतवणूक होत होती.

त्यांनी कोटक म्युच्युअल फंड विक्री प्रमुख या पदावर काम करत असताना म्युच्युअल फंड व्यवसाय (एयूएम) आठ हजार कोटींवरून सहा वर्षांत चाळीस हजार कोटींवर नेण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. वर्ष २०१२ नंतर त्यांनी एल अँड टी म्युच्युअल फंडात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम स्वीकारले. आज त्याचे एचएसबीसी म्युच्युअल फंडातील अधिग्रहणानंतर ते एचएसबीसी म्युच्युअल फंडात मुख्याधिकारी पदावर कार्यरत आहेत.

मागील काही वर्षांच्या सेबी आणि ॲम्फीच्या अर्थसाक्षरतेच्या प्रयत्नांमुळे म्युच्युअल फंड आज भारतातील प्रत्येक घरात पोहोचला आहे. ‘म्युच्युअल फंड सही है’ ही आर्थिक क्षेत्रातील जगातील पहिली अशी मोहीम होती, जिथे म्युच्युअल फंड कंपन्यांनी एकत्र येऊन म्युच्युअल फंडाचे फायदे सर्वदूर पोहोचवले. जाहिरातीसाठी ‘सेलिब्रिटी’चा उपयोग म्युच्युअल फंड उद्योगाने ‘इंडस्ट्री लेवल’वर केला. ‘एसआयपी’, दीर्घकालीन गुंतवणूक आणि सहजपणे पैसे काढून घेण्याची सुविधा’ यावर भर दिला गेला. बाजारातील अस्थिरतेला सामोरे जाऊन ज्यांनी दहा-पंधरा वर्षांत संपत्ती निर्मिती केली, त्यांच्या हातावरच्या रेषा नक्कीच बदलल्या. ज्यांना हे यश मिळाले त्यांनी मित्रांना आणि नातलगांना सांगितले आणि त्यामुळे ‘एसआयपी’चा ओघ वाढण्यास मदत झाली. ‘केबीसी’सारख्या लोकप्रिय कार्यक्रमातूनही म्युच्युअल फंडांची जाहिरात केली गेली.

म्युच्युअल फंड उद्योग कसा वाढत जातोय याबद्दल विचारले असता त्यांनी ‘फिन-टेक’ युगाच्या फायद्यावर भर दिला. सहा-सात वर्षांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ‘डिजिटल’ पद्धतीने होऊ लागल्यावर या उद्योगाने अधिक वेग पकडला आहे. पेन आणि पेपरमार्फत होणारी गुंतवणूक आता हळूहळू काळाच्या पडद्याआड जाईल असे मत मांडले. मी भाग्यवान आहे, या उद्योगाच्या उभारणीच्या काळातील सर्व स्थित्यंतरे जवळून अनुभवू शकलो, असा त्यांचा कातर झालेला स्वर बोलताना लपून राहिला नाही. आज ज्याला एक दिवसाची ‘ओव्हर नाइट’ फंडमधील गुंतवणूक करायची असो किंवा ३५-४० वर्षांचे ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’, सर्व म्युच्युअल फंडातील विविध योजनांमधून शक्य आहे.

हेही वाचा – Money Mantra : केतन पारेख घोटाळा (भाग २)

कैलास कुलकर्णी यांनी ‘ॲम्फी’च्या सल्लागार समितीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यातील एका ‘इझ ऑफ डुईंग बिसनेस’अंतर्गत ‘ट्रान्समिशन’ प्रक्रियेबद्दल सुसूत्रता आणली गेली. हे वानगीदाखलचे एक उदाहरण आहे. फंड उद्योगातील अनेक पैलूंवर आज त्यांचा सल्ला मागितला जातो. शेवटी त्यांना मी सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून सल्ला विचारला. गुंतवणूकदार समजत नसलेल्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करून नुकसान सोसतात (उदाहरणार्थ क्रिप्टोमधील गुंतवणूक), हे क्लेशदायी असते. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्याविषयी जोखीम लक्षात घेतली पाहिजे. तसेच गुंतवणूक आपल्या भविष्यातील आर्थिक ध्येय पूर्तीसाठी केली पाहिजे. अजूनही गुंतवणूकदार मुलांच्या शिक्षणासाठी, घरासाठी, मुलांच्या लग्नासाठी ज्या जागरूकपणे गुंतवणूक करतो तेवढी स्वतःच्या ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’विषयी करत नाही, हे अधोरेखित केले. डोळसपणे कुटुंबाच्या खर्चाचा अभ्यास केला तर अजूनही महिन्याकाठी अधिक पैसे आपण गुंतवू शकतो, याचे एक प्रात्यक्षिकच दाखवले. तसेच भारत प्रगतिपथावर राहील, जगातील अन्य देशांच्या तुलनेत आपण सुस्थितीत आहोत हे नमूद करतानाच ‘इक्विटी, डेट आणि गोल्ड’ या तीनही मालमत्ता वर्गात सकारात्मक वाढ दिसून येईल असे सांगितले. अस्थिरता हा बाजारातील अविभाज्य भाग नेहमीच राहिला आहे, त्या जोखीम व्यवस्थापानाच्या मदतीने आपण बाजारात चांगली संपत्तीनिर्मिती करू या.

गप्पांमधून एका मोठ्या काळाचीच बखर कैलाश कुलकर्णी सांगून गेले.