सुधाकर कुलकर्णी- सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर, पुणे

विवाहितांनी त्यांच्या आयुष्याचे नियोजन का करावे, याची माहिती आपण गेल्या लेखात घेतली. आता आपण त्यांचे नियोजन कसे असावे, ते उदाहरणांवरून समजून घेणार आहोत.

russia grain diplomacy marathi news
विश्लेषण: रशियाची ‘अन्नधान्य डिप्लोमसी’ काय आहे? तिची जगभरात चर्चा का?
Air India Recruitment 2024
Air India Recruitment 2024 : थेट मुलाखत! एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसकडून १४५ जागांसाठी भरती, २९ हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर

१) आपण गेल्या लेखात पाटील यांच्या कुटुंबाच्या नियोजनाबाबत माहिती घेतली त्याच पाटील यांनी हेल्थ इन्शुरन्स कसा घ्यावा ते आता पाहू. पाटील यांचे आई-वडील त्यांच्यावर अवलंबून असल्याने आणि त्या दोघांचे वय विचारात घेता, त्या दोघांत मिळून किमान रु. १० लाखांचे हेल्थ इन्शुरन्स कव्हर असणे गरजेचे आहे आणि त्याची पॉलिसी स्वतंत्र असणे सोईचे व फायदेशीर ठरेल. कारण- पाटील यांनी संपूर्ण कुटुंबासाठी रु. १० लाख कव्हर असणारी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी फ्लोटर पद्धतीने घेतली, तर संपूर्ण पॉलीसीचा प्रीमियम वडिलांच्या वयानुसार असेल; याउलट आई-वडिलांची पॉलिसी स्वतंत्रपणे घेतली, तर या पॉलिसीत केवळ त्या दोघांचाच समावेश असल्याने प्रीमियम वडिलांच्या वयानुसार असला तरी तो कमी असेल.

तर, उर्वरित चौघांसाठी रु. १० लाख कव्हरची पॉलिसी घेतल्यास या पॉलिसीचा प्रीमियम पाटील यांच्या वयानुसार असल्याने कमी असेल. या दोन्हीही पॉलिसी घेताना रु. तीन लाखांची बेस पॉलिसी घेऊन उर्वरित रु. सात लाखांची टॉपअप पॉलिसी घेल्यास एकत्रित पडणारा प्रीमियम बराच कमी असेल. त्यामुळे हॉस्पिटलायझेशनपोटी होणाऱ्या बहुतांश खर्चाची भरपाई होऊ शकेल (आजकाल बहुतेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाच रक्कम भरावी लागत नाही).

हेही वाचा… Money Mantra : श्रीमंत व्हायचंय! मग कंपाऊंडिंग शक्ती वापरा अन् ‘या’ १० गोष्टींचं पालन करा

२) आता आपण पाटील यांनी ॲक्सिडेंट पॉलिसी का व कशी घ्यावी हे पाहू. ॲक्सिडेंट ही अचानक; परंतु आपले नियंत्रण नसणारी घटना असून ती कोणच्याही आयुष्यात घडू शकते आणि यातून अपघाती मृत्यू , अपंगत्व, तसेच हॉस्पिटलायझेशन अशा तीन गोष्टींची शक्यता असते. पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला, तर पॉलिसी कव्हरची संपूर्ण रक्कम वारसास क्लेम म्हणून दिली जाते. अपघातात पॉलिसीधारकास अपंगत्व आले, तर अपंगत्वाच्या प्रमाणात (टक्केवारीनुसार) पॉलिसीधारकास क्लेम दिला जातो. उदा. पॉलिसीधारकास कायम स्वरूपाचे १००% अपंगत्व आले (दोन पाय / दोन हात / दोन्ही डोळे / एक हात / एक पाय अपघातात गमवावे लागले, तर त्यास १००% अपंगत्व समजले जाते), तर पॉलिसीधारकास कव्हरची संपूर्ण रक्कम क्लेमपोटी दिली जाते.

जर अपघातात अंशत: अपंगत्व आले, तर त्या प्रमाणात क्लेमची रक्कम पॉलिसीधारकास दिली जाते. उदा. पॉलिसीधारकास मिळणारी कव्हरची रक्कम रु. २५ लाख आहे आणि अपंगत्व ४०% असेल, तर पॉलिसीधारकास रु. १० लाख क्लेम म्हणून मिळतील. अपंगत्वाची टक्केवारी संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टर ठरवीत असतात. त्याशिवाय अपघातामुळे पॉलिसीधारकास हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्यास प्रतिआठवड्यास रु. ५०० इतकी रक्कम हॉस्पिटलमधील वास्तव्य किंवा १०२ आठवडे यातील कमी असलेल्या कालावधीसाठी दिली जाते.

हेही वाचा… Money Mantra : पहिल्यांदाच शेअर बाजारात गुंतवणूक करताय; मग काय करावे अन् काय करू नये, जाणून घ्या…

३) आता आपण होम लोन इन्शुरन्स पॉलिसी का घ्यावी हे पाहू. समजा- पाटील यांनी वयाच्या ३० व्या वर्षी रु. ७५ लाखांचे होम लोन घेतले आहे आणि वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांचे दुर्दैवी निधन झाले, तर सुरवातीच्या काळात परतफेडीच्या हप्त्याच्या रकमेतील बहुतांश भाग हा व्याजापोटी जात असल्याने त्यांच्या खात्यावर त्यावेळी सुमारे ६५ ते ६७ लाख इतके कर्ज शिल्लक असेल आणि हे कर्ज फेडण्याची जबाबदारी कुटुंबावर येऊन पडते. पाटील यांच्या उत्पन्नाशिवाय कुटुंबाचे अन्य काही उत्पन्न नसेल, तर कर्जाची परतफेड करणे शक्य होणार नाही. परिणामी बँकेस घराची विक्री करून वसुली करावी लागेल आणि त्यामुळे कुटुंबीयांवर बेघर होण्याची परिस्थिती येऊ शकते.

हेच जर पाटील यांनी कर्ज रकमेइतके होम लोन इन्शुरन्स घेतले असेल, तर कर्ज खात्यावरील सर्व रक्कम बँकेस क्लेमपोटी मिळेल आणि कर्ज न फेडताही घराचा ताबा कुटुंबीयांकडे राहील. आजकाल बहुतेक सर्व बँका गृह कर्ज देताना होम लोन इन्शुरन्स घेणे बंधनकारक करतात आणि तसे करणे दोघांच्याही हिताचे आहे. त्यासाठी द्यावा लागणारा एकरकमी प्रीमियम कर्जाच्या रकमेत समाविष्ट केला जातो आणि त्यामुळे तेवढ्या प्रमाणात दरमहाचा परतफेडीचा हप्ता (ईएमआय) वाढविला जातो.

हेही वाचा… Money Mantra: राष्ट्रीय विमा जागरुकता दिवस विशेष- विमा कशासाठी?

पाटील पती-पत्नी दोघेही कमावते असतील, तर हेल्थ इन्शुरन्स व होम लोन इन्शुरन्समध्ये बदल करण्याची गरज नाही; मात्र लाइफ इन्शुरन्स पॉलिसी पाटील यांच्या पत्नीने स्वतंत्रपणे घेणे जास्त योग्य राहील. अशी पॉलिसी टर्म इन्शुरन्स पद्धतीनेच घ्यावी आणि तीही त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या १० ते १२ पट इतकी असावी. अशी पॉलिसी दोघांच्या संयुक्त नावावरसुद्धा घेता येते; तथापि स्वतंत्र पॉलिसी घेणे जास्त योग्य असते. त्याशिवाय पाटील यांच्या पत्नीने ॲक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी घेणेसुद्धा गरजेचे आहे.

थोडक्यात असे म्हणता येईल की, आपली इन्शुरन्सची गरज लक्षात घेऊन, आवश्यक ते सर्व प्रकारचे इन्शुरन्स कव्हर कुटुंबाकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे मृत्यू, आजारपण, अपघात यांसारख्या घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक समस्येच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मदत मिळू शकते. म्हणून इन्शुरन्सकडे गुंतवणूक म्हणून न पाहता, आपत्कालीन गरज म्हणूनच पाहणे आवश्यक आहे. आता सर्व प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसिज ऑनलाईनसुद्धा घेता येतात आणि त्यामुळे थोडा प्रीमियमही कमी पडतो.