मी बारावी झालो आहे. यशवंतराव चव्हाण विद्यापीठामधून बीए करत आहे. मी सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. यूपीएससी देण्यासाठीची अर्हता म्हणून मुक्त विद्यापीठाची पदवी चालेल ना? मी दोन वर्षांची गॅप घेतली होती. नंतर अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. पण त्यात मी अपयशी ठरलो. आता मी काय करू? - आशीष कोळेकर अभियांत्रिकीच्या शिक्षणात अपयश आले, याचे वाईट वाटून घेऊ नकोस. निराशही होऊ नको. कदाचित तू कुणाच्या दबावाखाली अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेला असेल. ज्या अभ्यासात आपल्याला रस नाही, ज्या शिक्षणात रस नसेल वा गती नसेल तो अभ्यासक्रम करण्यात काही हशील नसतो. त्यामुळे तुझी दोन र्वष वाया गेली, असं समजू नको तर या दोन वर्षांनी तुला तुझ्यातली कमी ओळखण्याची आणि क्षमता सुधारण्याची संधी दिली असे समज. तू आता यूपीएससीची तयारी सुरू केली आहेस, ही बाब चांगलीच आहे. त्यासाठी मुक्त विद्यापीठाची पदवी ग्राह्य़ धरली जाते. त्यामुळे काळजी नसावी. तू आपली क्षमता ओळखून चांगला अभ्यास कर. मी नर्सिगमध्ये पदवी घेतली आहे. पण मला आता माझी ज्ञानशाखा बदलावीशी वाटते आहे. आता पुन्हा नव्याने पदवी अभ्यासक्रम करणे योग्य ठरणार नाही. मी काय करावे? - किरण चौधरी खरेतर नर्सिगच्या क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. यामध्ये चांगले करिअर होऊ शकते. यामध्ये पदव्युत्तर पदवी आणि त्यानंतर पीएचडीसुद्धा करता येते. तथापि तुला आता दुसरे कोणतेही पदवी शिक्षण घ्यायचे नाही, असे तू कळवले आहेस. ही बाब लक्षात घेता, तुला आणखी एक पर्याय राहतो. तो म्हणजे स्पर्धा परीक्षांचा. याद्वारे प्रशासकीय करिअर साकारता येते. माझे कृषी विषयात बी.एस्सी. झाले आहे. आता मी काय करू? - सूरज ठाकरे पुढील चार प्रकारे तू तुझ्या करिअरला दिशा देऊ शकतोस. कृषी विषयात एम.एमस्सी. आणि त्यानंतर पीएच.डी. करून अध्यापन किंवा कृषी संशोधन क्षेत्रात जाऊ शकतोस. संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी भारतीय वनसेवा परीक्षा तसेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य वनसेवा परीक्षा देऊन वन विभागात अधिकारी पद मिळवू शकतोस. अहमदाबादस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेट या संस्थेचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट इन अॅग्रिकल्चर मॅनेजमेंट या स्पेशलाइज्ड अभ्यासक्रमास, कॉमन एन्ट्रन्स टेस्टद्वारे प्रवेश मिळवून कृषी औद्योगिक कंपन्यांमध्ये उच्च श्रेणीच्या व्यवस्थापकीय पदांवर जाऊ शकतोस. कृषी पदवीधरांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जातात. त्यासाठीही तू प्रयत्न करू शकतोस. तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.