भारतीय संस्कृतीमध्ये कित्येक मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय आहे ती द्रोणाचार्य आणि त्यांचा प्रसिद्ध शिष्य अर्जुन यांची. त्याचबरोबर एकलव्याने द्रोणाचार्याना गुरू मानून जे साध्य केले, ती कथाही प्रसिद्ध आहे. अर्जुन आणि एकलव्य हे दोघेही त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात. पण त्यानंतर द्रोणाचार्यानी गुरुदक्षिणेची मागणी केली आणि एकलव्याने जे कौशल्य प्राप्त केले होते, तेच काढून घेतले.
कदाचित त्याची कला ही त्या वेळी अर्जुनापेक्षा सरस ठरली असती. आता वाद असा झडतो की खरा गुरू कोण होता आणि खरा शिष्य कोण होता? एकलव्य आपल्या समर्पणासाठी आणि आपल्या गुरूवरील विश्वासासाठी ओळखला जातो. प्रत्येक देश आणि तिथली मानवी संस्कृती वेगळी आहे आणि त्याबद्दल काही समज आहेत. काही महाकाव्ये, काही लोककथा आहेत. लोककलांमध्ये शिक्षक आणि त्याचे शिष्य आणि इतर शिष्य यांच्यातील संबंधांविषयी प्रशंसोद्गार येतात. जगभरात कुठेही गुरूंना आणि शिक्षकांना सर्वसाधारणपणे आदर दिला जातो. काहींना आदर आणि प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या सदसद्विवेकाचा भाग होतात. हे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाहीत, तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतातच, पण त्याचबरोबर आपले तत्त्वज्ञान आणि दृष्टिकोन यांच्या माध्यमातून शिक्षक जे विद्यार्थी आपल्या आयुष्यातील द्वंद्वाशी झुंजत असतात अशांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यांना भेडसावत असलेल्या समस्यांना ते हात घालतात. जी स्वप्ने मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हे शिक्षक प्रयत्नशील असतात. या गोष्टी औपचारिक (वर्गात) आणि अनौपचारिक (संवाद आणि चर्चा) माध्यमांतून आकाराला येत असतात. कारण अशा संवादांमधूनच त्यांचा जो दृष्टिकोन असतो तो विद्यार्थ्यांकडून आत्मसात केला जातो. त्याशिवाय विजेच्या वेगाने येणाऱ्या संकल्पना आणि स्वातंत्र्याची जाणीव या गोष्टींमुळे या विद्यार्थ्यांना त्यांची दिशा ठरविणे आणि पुढील निर्णय घेणे शक्य होते. शिक्षकांचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे होते. त्यातून विद्यार्थ्यांना निवड करणे आणि त्याच्या आयुष्यातील द्वंद्वावर उत्तर शोधणे शक्य होत होते. जसजसा काळ बदलला, तशी शिक्षकांची भूमिका ज्ञान पुरविण्यापुरती संकुचित होत गेली. त्यातही पुढे आणखी संकोच झाला आणि ठराविक विषयावरील ज्ञान देण्यापुरतीच ही भूमिका मर्यादित राहिली. नियम, अटी, धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे ही संस्थांकडून आणि नियामक संस्थांकडून ठरवली गेली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर कसा संवाद ठेवावा किंवा कसे संबंध ठेवावेत, हे त्यांच्याकडून ठरविले जाऊ लागले. पुढे जसजसा काळ बदलत गेला तसा अध्ययनाचा आणि जीवनाचा भव्य असा आवाकाच शिक्षकांसाठी संकुचित होत गेला. केवळ ज्ञान पुरविण्याची आपली भूमिका आहे, असा संकुचित समज दृढ झाला. काळानुसार शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले संबंध हे नात्यांमध्ये बदलत केले. ज्याप्रमाणे समाज, संस्कृती, बाह्य़ वातावरण आणि कुटुंबे यांच्यात बदल झाला, तसाच बदल शैक्षणिक संस्थांमध्येसुद्धा झाला आहे. या बदलानुसार शिक्षकांची भूमिकाही बदलली आहे. नव्या पिढीशी आणि त्यांच्या आयुष्यासंबंधी संवाद साधणे आणि चर्चा करणे आवडत असल्याने शिक्षक आपला व्यवसाय निवडतात. त्यातून उभारणीचा एक वेगळा अनुभव प्राप्त होतो. बऱ्याचदा या शिक्षकांना आपले शिष्य उंचीवर जाताना आणि भक्कम नागरिक म्हणून नावारूपाला येताना पाहायला मिळते. अध्ययनामध्ये अशा प्रकारे ज्ञान आणि शहाणपण यांना एकेकाळी वेगळे महत्त्व होते. या गोष्टी अनुभवामध्ये परावíतत होत असत आणि त्यातून जगाच्या आणि आयुष्यातील मूल्यांच्या बाबतीतील दृष्टिकोनातील शहाणपण जागृत होई. वय, अनुभव आणि जगाचा दृष्टिकोन हा सामाजिक ढाच्यांच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने विकसित होत असे. त्यातील अचूकतेमधून शिक्षकाला मार्गदर्शकाची व सल्लागाराची भूमिका प्राप्त होत असे. त्यातून संवाद आणि चर्चा यांना आकार येत असे. काळ बदलतो, भूमिका बदलतात, तसेच आकाराला येणाऱ्या आयुष्यातील बदलाप्रमाणे आयुष्याचा अर्थही बदलतो. त्यामुळे नातेसंबंधांचा अर्थही बदलतो. आजच्या इंटरनेट आणि फेसबुक, ट्विटर व ब्लॉग्जच्या जमान्यात, प्रश्नांची उत्तरे देण्याचा अधिकार पालकांकडे आणि शिक्षकांकडे राहत नाही. तो अधिकार आता इंटरनेटने हिरावून घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंध हा गतकाळापेक्षा दर्जात्मकदृष्टय़ा भिन्न असायला हवा. ही सर्व स्थित्यंतरे समोर मांडल्यानंतर आजही शिक्षकांच्या भूमिकेमध्ये सातत्य आहे. शिक्षकांची भूमिका ही अधिक संवादरूपी आणि दर्जात्मक असायला हवी. केवळ माहिती, ज्ञान आणि/ किंवा भरपूर साठा देऊन चालत नाही, तर त्यात आयुष्याच्या अनुभवांची जोड असणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांना वृद्धी आणि संवेदनशीलता आणि प्रतिष्ठा यांच्या आघाडीवर घेऊन जाण्याचे काम शिक्षकांना करावे लागते. शिक्षकांना जागा निर्माण करावी लागते आणि अध्ययन वातावरण तयार करावे लागते. शिक्षकांना तेथे बाहुल्य आणि वैविध्य आणावे लागते. मूल्ये आणि मानवी अस्तित्व यांच्या पाश्र्वभूमीवरील शहाणपणाची सखोलता आणि उंची प्राप्त करावी लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career vruttant teacher education students teaching
First published on: 10-09-2012 at 11:11 IST