श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये भारताचा व जगाचा भूगोल कसा अभ्यासावा, याची माहिती घेऊ. या विषयाचे स्वरूप Semi- Scientific असल्यामुळे या विषयाचा संकल्पनात्मक पाया याचबरोबर संबंधित प्रदेशाची प्राकृतिक रचना, आर्थिक व सामाजिक पध्दती तसेच लोकसंख्या इत्यादींची सखोल माहिती असणे परीक्षेच्या दृष्टीने क्रमप्राप्त ठरते. मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न ‘भारताचा भूगोल’ या घटकावर विचारले जातात. यामध्ये भारताची प्राकृतिक रचना, आर्थिक व सामाजिक पध्दती तसेच लोकसंख्या यासारख्या वैशिष्टय़पूर्ण पैलूंवर अधिक भर असतो. याचबरोबर जगाचा भूगोल या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या तुलनेने कमी असते. गतवर्षीय मुख्य परीक्षांमध्ये (२०१३-२०२१पर्यंत) या घटकांवर विचारण्यात आलेले कांही प्रश्न.
२०२१ मध्ये भारताला उपखंड का मानले जाते? विस्तृतपणे उत्तर द्या असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. याचवर्षी हिमालय आणि पश्चिम घाट येथे होणारे भू-स्खलन यामधील फरक काय आहे. असाही प्रश्न विचारण्यात आला होता.
२०२० मध्ये ‘वाळवंटीकरण प्रक्रियेस हवामानाच्या सीमा नसतात. उदाहरणासह समर्थन करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. याचवर्षी ‘हिमालयामधील हिमनद्यांचे वितळणे भारताच्या जल संसाधनावर कशाप्रकारे दूरगामी परिणाम करणारे आहे?’ असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता.
२०१९ मध्ये जागतिक तापमानवाढीमुळे प्रवाळ जीवन पद्धतीवर (India Geography of the world) झालेल्या परिणामांचे उदाहरणासह मूल्यांकन करा. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
२०१८ च्या मुख्य परीक्षेत समुद्री पारिस्थितिकीवर मृत क्षेत्रे यांच्या विस्ताराचे कोणकोणते परिणाम होतात? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
२०१७ च्या मुख्य परीक्षेत ‘‘महासागरीय क्षारतामधील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा’’. हा प्रश्न विचारण्यात आला होता.
२०१६ च्या मुख्य परीक्षेत भारतातील प्रमुख शहरातील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते.
२०१५ च्या मुख्य परीक्षेत ‘‘मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीतील वायू प्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे.’’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचा कल हवामान व पर्यावरणसंबंधी अनुषंगाने होता पण याचबरोबर या शहरांची भौगोलिक स्थाने व यासाठी जबाबदार असलेल्या प्राकृतिक घटक, त्याचबरोबर औद्योगिकीकरण व शहरीकरण इत्यादी गोष्टींचा एकत्रित विचार करून उत्तर लिहिणे अपेक्षित होते.
२०१४ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘‘उष्णदेशीय चक्रीवादळे ही दक्षिण चिनी समुद्र, बंगालचा उपसागर आणि मेक्सिकोचे आखात यांसारख्या प्रदेशात मोठयम प्रमाणात मर्यादित असतात, कारण’’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न प्राकृतिक भूगोलातील हवामान घटकाशी संबंधित आहे व जगातील तीन भौगोलिक स्थानांशी जोडला गेलेला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित भौगोलिक स्थानांची प्राकृतिक रचना तसेच या प्रदेशातील हवामानपध्दती व याच प्रदेशामध्ये ही चक्रीवादळे इतर प्रदेशाच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतात याची कारणे सर्वप्रथम माहिती असणे आवश्यक आहे. या प्रश्नांचा रोख हा उष्णप्रदेशीय चक्रीवादळे यासाठी नेमके कोणते घटक (प्राकृतिक) जबाबदार आहेत व उत्तरामध्ये फक्त यासाठीची कारणे लिहिणे अपेक्षित आहे, ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून असणारी सुसंगत व समर्पक माहिती उत्तरामध्ये आपण देऊ शकतो.
२०१३ च्या मुख्य परीक्षेत ‘‘दक्षिण भारतातील राज्यामध्ये नवीन साखर उद्योग स्थापन करण्याचा कल वाढत आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? समर्थनासह चर्चा करा.’’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित आहे. पण यासाठी काही भौगोलिक कारणे महत्त्वाची ठरतात व त्यांचा उल्लेख उत्तरामध्ये करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. साखर उद्योग स्थापन करण्यासाठी नैसर्गिकरीत्या पूरक असणारे घटक व उपलब्ध साधनसंपत्ती, सक्षम दळणवळणाचे उपलब्ध पर्याय व यासाठी पूरक असणारी जमीन ज्यामध्ये ऊस हे पीक घेणे अधिक उपयुक्त ठरते, इत्यादी माहितीची चर्चा उत्तरामध्ये करणे आपेक्षित आहे.
भूगोल या घटकावर २०१३ ते २०२१ पर्यंतच्या मुख्य परीक्षांमध्ये एकूण ७१ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ह्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भूगोल या विषयामधील जवळपास सर्व घटकांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि सर्वाधिक भर हा भारताच्या भूगोलावर आहे पण बहुतांश प्रश्न प्राकृतिक आणि आर्थिक घटकांचा एकत्रित संबंध जोडून विचारण्यात आलेले आहेत. यातील अनेक प्रश्नांना विषयाच्या पारंपरिक ज्ञानासह चालू घडामोडींची पार्श्वभूमी जोडण्यात आलेली आहे, हे पुढील विश्लेषणावरून लक्षात येते. उपरोक्त नमूद केलेल्या मागील प्रश्नांचा एक संक्षिप्त आढावा तुम्हाला भूगोल या विषयाचा परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असे वाटते. पण याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रश्नाचा नेमका रोख ओळखता येणे अपेक्षित आहे आणि समर्पक माहिती उत्तरामध्ये समर्पकपणे देता आली पाहिजे. तसेच प्रत्येक प्रश्नासाठी शब्द मर्यादा दिलेली असते. याचे भान ठेऊन परीक्षार्थीने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

loksatta analysis imd predict india to receive above normal monsoon
विश्लेषण : यंदा दमदार पावसाचा अंदाज का वर्तवला जात आहे?
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…